⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

लग्न समारंभानंतर गावी परत जाणाऱ्यांवर काळाची झडप; अपघातात एकाच गावातील 6 जणांचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२३ । रस्ते अपघाताचे सत्र सुरूच असून अशातच भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत लग्न समारंभ आटोपून गावी परत जाणाऱ्या एकाच गावातील 6 लोकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपूरच्या काटोल तालुक्यात मध्यरात्री घडली. मृतकामध्ये दोन सख्या चुलत भावाचा समावेश.

अपघातात मृत सर्व जण नागपूरच्या काटोल तालुक्यातील मेंढेपठार बाजार गावातील रहिवासी होते. नागपूरच्या काटोल तालुक्यातील मेंढेपठार बाजार गावातील चंद्रशेखर चिखले यांच्या मुलीचे नागपुरात लग्न होते. या लग्नासाठी वऱ्हाड नागपूरला गेले होते.

शुक्रवारी ते वऱ्हाड परत गावी येण्यासाठी निघाले असता मध्यरात्री सोनखांब ते ताराबोडी वेगाने जाणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. त्यांनतर कारमध्ये बसलेल्या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. यामधील एका जणाची प्रकृती गंभीर आहे. जखमीला नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले आहे.अपघाताची माहिती मिळल्यावर तात्काळ पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचावकार्य सुरू केले. यावेळी पोलिसांना स्थानिक नागरिकांनीही मदत केली. गाडीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले. तसेच अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णालयात पाठवण्यात आले.

या सहा जणांचा मृत्यू
या अपघातात अजय दशरथ चिखले (वय 45), विठ्ठल दिगंबर थोटे (वय 45), सुधाकर रामचंद्र मानकर (वय 42), रमेश ओंकार हेलोंडे (वय 48), मयूर मोरेश्वर इंगळे (वय 26), वैभव साहेबराव चिखले (वय 32) यांचा मृत्यू झाला आहे. यामधील अजय चिखले आणि वैभव चिखले हे सख्ये चुलत भाऊ आहे. लग्न आटोपून आनंदात असणारे चिखले कुटुंबियांवर या घटनेनंतर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.