जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२५ । एकीकडे राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला असताना राज्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे. सोमवारी सायंकाळी जळगावमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. यादरम्यान शेतात पिकांची राखण करण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय नातवाच्या अंगावर वीज पडल्यामुळे जागीच मृत्यू झाला तर आजोबा गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना जळगाव तालुक्यातील धानवड परिसरामध्ये घडली. अंकुश विलास राठोड (१५, रा. धानवड, ता. जळगाव) असं मयत मुलाचे नाव असून शिवाजी जगराम राठोड (६५) असं जखमी आजोबाचे नाव आहे. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या घटनेबाबत असे की, अंकुश राठोड हा मुलगा आजोबा शिवाजी राठोड यांच्यासह नेहमीप्रमाणे शेतात पिकांची राखण करण्यासाठी गेला होता. सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक विजांसह अवकाळी पाऊस सुरू झाला. त्यावेळी धानवड ते भवानी खोरा रस्त्यावर असलेल्या शेतात वीज कोसळून अंकुश राठोड या मुलाचा मृत्यू झाला तर आजोबा शिवाजी राठोड हे भाजले गेले. ही घटना आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी राठोड यांच्या कुटुंबियांना माहिती दिली.
या घटनेनंतर नागरिकांनी अंकुश राठोड व आजोबा शिवाजी राठोड या दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच अंकुशचा मृत्यू झाला होता तर गंभीर शिवाजी राठोड यांच्यावर उपचार सुरू आहे.