जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । हवामान विभागाच्या अंदाजानुसार शुक्रवारी उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पाऊस हाेण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात तापमान ४२.२ अंशांवर आहे. वाऱ्याचा वेग ताशी १७ किमीपर्यंत असल्याने उष्णतेच्या झळांची तीव्रता वाढलेली आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यावर अवकाळी पावसाचे सावट आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सावधान राहण्याची गरज आहे. अवकाळीचे ढग गडद झाल्याने शेतकऱ्यांच्या पोटात भितीचा गोळा उठला आहे. रब्बी हंगामातील गहू, दादर, ज्वारी, हरभरा या पिकांचा हंगाम बऱ्यापैकी आटोपला आहे. मात्र, अनेकांच्या शेतात चारा पडून आहे. शिवाय केळी देखील कापणीवर आलेली आहे. अवकाळी पाऊस झाल्यास ही पिके अडचणीत येतील. गुरुवारी जिल्ह्याचे तापमान ४२.२ असले तरी भुसावळ शहराचे तापमान मात्र ४३.९ अंश हाेते. गेल्या आठवड्यापासून तापमान ४४ अंशांच्या पुढे होते. मात्र, तीन दिवसांपासून त्यात काहीशी घट झाली होती. गुरुवारी तापमानात पुन्हा काहीशी वाढ झाली. या तापमानापासून बचावासाठी अनेकांनी दुपारी घराबाहेर पडणे टाळले. |








