⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

जळगाव जिल्हा हादरला : किरकोळ कारणामुळे तरुणाची चाकूने भोसकून हत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२३ । गावातील तरुणाचा धक्का लागल्याने आरोपी तरुणाने आणि त्याच्या कुटुंबातील पाच जणांनी तरुणाच्या घरी जाऊन चाकूने भोसकून त्याची हत्या केल्याची घटना घटना चोपडा तालुक्यात घडलीय. भोजू वासुदेव कोळी (वय ३२, रा. विरवाडे ता. चोपडा) असं मयत तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून एका महिलेसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकी काय आहे घटना?
चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील भोजू कोळी या तरुणाचा त्याच्या गावातीलच दिपक कोळी याला धक्का लागला. यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादातून २ मार्च रोजी रात्री ८:३० ते ९ वाजेच्या दरम्यान भोजू कोळी याच्याकडे सागर देविदास कोळी, दिपक सुभाष कोळी, कैलास गुलाब कोळी, मनोहर संतोष कोळी आणि शोभाबाई देविदास कोळी (सर्व रा. विरवाडे ता.चोपडा) हे गेले. त्यांनी भोजू कोळी आणि त्याचा भाऊ राजेंद्र कोळी यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली. यादरम्यान भोजू कोळी आणि राजेंद्र कोळी यांना शिवीगाळ दमदाटी तसेच धक्काबुक्की केली. यात सागर कोळी याने भोजू कोळी याचा भाऊ राजेंद्र कोळी याच्या कपाळावर दगड मारून डोके फोडून दुखापत केली.

चाकू भोसकून केली गंभीर दुखापत

त्यानंतर सागर कोळी, शोभाबाई आणि वासुदेव कोळी यांनी भोजू यास शिवीगाळ, दमदाटी लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत सागर कोळी याने त्याच्या जवळ असलेल्या चाकूने भोजू कोळी याच्या मानेजवळ तसेच पाठीवर आणि इतर ठिकाणी भोसकून गंभीर दुखापत केली. जखमी अवस्थेत भोजू कोळी याला चोपडा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान भोजू कोळी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पाच जणांना अटक

या प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले हे करत आहेत. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला चाकू देखील जप्त केला आहे.