⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

वन्यप्रेमींनी जागवली रात्र : वाघ नव्हे पण सायाळ, भेकर, चिंकारा, लंगूर, नीलगायने दिले दर्शन

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२२ । बुद्धपौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी वन्यप्राण्यांची प्रगणना करण्यात आली. याकरिता वनविभाग आणि वन्यजीव संरक्षण संस्थेचे कार्यकर्ते सज्ज झाले होते. जिल्ह्यातील मुक्ताई भवानी कॉन्झर्वेशन रिझर्व्ह वनपरिक्षेत्रात डोलारखेडा, चारठाणा, भागात कृत्रिम व नैसर्गिक पाणवठ्यांच्या परिसरात मचाणांची व्यवस्था करण्यात आली होती. १५ सदस्य डोलारखेडा वनक्षेत्रात दाखल झाले होते. जळगांव मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक, नासिक मानद वन्यजीव रक्षक अमित खरे यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव प्रेमींनी प्रगणना कार्यक्रम यशस्वी केला कृत्रिम पाणवठे भरण्याकरिता वनविभागाकडून प्रभावी उपाययोजना करण्यात आलेल्या होत्या.

दरवर्षी संपूर्ण देशात बुद्धपौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशात वन्यप्राण्यांच्या प्रगणनेचा उपक्रम वनविभागाकडून आयोजित केला जातो जळगांव जिल्ह्यातही या दिवशी 16 मे ला सायंकाळी ४ वाजता प्रगणनेला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता प्रगणना समाप्त झाली. यंदाच्या प्रगणनेत जिल्हा भरातून वन्यजीव प्रेमी उपस्थित होते वन्यजीव संरक्षण संस्थेचे बाळकृष्ण देवरे, रवींद्र फालक, राहुल सोनवणे , प्रसाद सोनवणे, अमन गुजर, वासुदेव वाढे, राजेश सोनवणे, जगदीश बैरागी, कल्पेश तायडे, छाया ढोले, रोहित श्रीवास्तव, आकाश चौधरी, लक्ष्मीकांत नेवे, चेतन हिरे , नितीन जोशी, कुशल अग्रवाल यांनी सहभाग घेतला.

डोलारखेडा भागात वाघांचा मुक्त संचार असल्याने प्रत्येकाला वाघ बघण्याची उत्सुकता होती , प्रत्येक कृत्रिम आणि नैसर्गिक पांणवठ्यांवर मचाणाच्या व्यवस्था करण्यात आल्या होत्या परंतु वाघाने दुई शिवारात रस्त्यावर ठाण मांडले होते वाघ निघून गेल्यावर वन्यजीव प्रेमींना ही माहिती मिळाली म्हणून उस्थाह वाढला प्रत्येक वन्यजीव प्रेमींनी रात्र जागून काढली परंतु पाणवठे असलेल्या भागात वाघाने दर्शन दिलेच नाही मात्र सायाळ, चितळ, भेकर, नीलगाय, लंगुर, चिंकारा, मुंगूस, ट्री श्रु (झाड चिचुंद्री), सारखे वन्यजीवन बघून अनेक वन्यजीव प्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फिटले उत्तर डोलारखेडा भागात प्राणी कमी संख्येत आल्याने लोखंडी मनोऱ्यावर उपस्थित वन्यजीव प्रेमींची यंदा निराशा झाली असे बाळकृष्ण देवरे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील या महत्वाच्या वनपरिक्षेत्रात वाघ, बिबट, अस्वल, हरिण, रानकुत्रे, लांडगे, तडस, गवा यासह अन्य वन्यप्राण्यांची संख्या मोठी असल्याने वन्यजीव प्रेमींनी डोलारखेडा आणि चारठाणा भागास प्रथम पसंती दिली . बुद्धपौर्णिमेला चंद्राचा प्रकाश असतो. वन्यप्राणी सायंकाळनंतर पाणवठ्यांवर येत असल्याने गणनेस मदत झाली.

– रवींद्र फालक, मानद वन्यजीव रक्षक

डोलारखेडा उत्तर भागात तृणभक्षी प्राणी संख्या जास्त आहे याचं भागात गवताळ कुरण विकसित करण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे , वनविभागाने उत्कृष्ट लोखंडी मनोरे आणि कृत्रिम पाणवठे बांधले असून या भागात पाणी पोचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते जर या ठिकाणी बोअर आणि सोलर पंप उभारला तर इतरत्र भटकणारे वन्यजीव याच भागात राहतील

– बाळकृष्ण देवरे , वन्यजीव संरक्षण संस्था , जळगांव