⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

‘हॉट सिटी’ जळगावमध्ये उष्माघाताचे रुग्ण का वाढत आहेत? हे आहे शास्त्रीय कारण

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२३ । मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून जळगाव जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ४७ अंशांपर्यंत तापमान पोहचल्याने जळगावची देशातील सर्वाधिक ‘हॉट सिटी’ अशी नोंद झाली. ४७ अंशांपर्यंत गेलेले तापमान ‘मोचा’ वादळामुळे काहीसे खाली आले होते. मात्र, शुक्रवारी (ता. १९) तापमान पुन्हा वाढू लागले आहे. हवामानतज्ज्ञांच्या मते २० ते २४ दरम्यान पुन्हा उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, तसेच ४८ अंशांपर्यंत तापमान जाण्याचा अंदाज वर्तविला आहे. या दिवसांमध्ये जिल्ह्यात उष्माघाताचे रुग्ण वाढत आहे. उष्माघातामुळे मृत्यूमुखी पडण्याच्या काही घटना समोर आल्या आहेत.

देशभरात सर्वाधिक ‘हॉट सिटी’ म्हणून यंदा दोनवेळा जळगाव शहरातील तापमानाची नोंद झाली. गेल्या आठवड्यात जळगावच्या तापमानाचा पारा ४७ अंशांपर्यंत पोचला. त्यामुळे काही दिवसांपासून उष्माघाताचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे या वाढत्या तीव्र उन्हात बाहेर पडताना प्रत्येकाने जरा जपून, योग्य काळजी घेऊनच बाहेर पडले पाहिजे. ‘अल निनो’ च्या प्रभावामुळे जिल्हा प्रशासनाने उन्हाळा अतिशय कडक राहणार असल्याचे अगोदरच स्पष्ट केले आहे. नागरिकांनी दुपारी बारा ते सायंकाळी पाचदरम्यान घराबाहेर पडून उन्हात कामे करणे टाळावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

शरीरातील सामान्य तापमान ३७ अंश सेल्सिअस असते. मात्र, सध्या दररोज सरासरी ४२ अंशाच्या वर तापमानची नोंद होत आहे. जेंव्हा शरिराबाहेरील वातावरणाचे तापमान वाढते तेंव्हा त्याचा परिणाम शरिरावरही जाणवतो. शरिराचे आवश्यकतेपेक्षा जास्त तापमान वाढल्यास मेंदूतील हायपोथॅलोमसचे शरीरावरील नियंत्रण सुटते. परिणामी, रक्तातील प्रथिने उकळायला लागल्याने रक्त घट्ट होते. त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा होत नाही. मेंदूचे शरीरावरील नियंत्रण सुटून मेंदूला इजा होते व त्यातच व्यक्तीचा मृत्यू होतो.

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण झापट्याने कमी होत असते. यासाठी उन्हाळ्यात थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे. शक्यता दुपारी १२ ते ४ वाजे दरम्यान बाहेर उन्हात जाणे टाळावे. उष्माघाताचा फटका बसल्यानंतर श्वासोच्छवासास त्रास होणे. त्यातून झटके येणे, अशक्तपणा जाणवणे, ग्लानी येणे, रुग्ण बेशुद्ध होणे, उलट्या होणे आदी लक्षणे जाणवतात. ज्यावेळी तीव्र उन्हाचा फटका बसला असतो तेंव्हा व्यक्तीचे स्नायू कडक होतात आणि श्वसनास त्रास होतो, त्या वेळी वरील प्रथमोपचार करून जवळच्या रुग्णालयात न्यावे.