जळगावचे किमान तापमान पुन्हा घसरले, पण थंडी नाहीच; ‘या’ तारखेपासून वाढणार कडाक्याची थंडी?
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२४ । गेल्या आठवड्यात नागरिकांनी गुलाबी थंडीचा अनुभव घेतला. मात्र फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, थंडी गायब झाली आहे. असे असले तरी एकाच दिवसात जळगावचे किमान तापमान ४ अंशाने घसरले.
या आठवड्यात जळगावकरांना थंडी ऐवजी गर्मीचा सामना करावा लागला. मंगळवारी १८. ८ अंशावर असलेला पारा बुधवारी १४. ८ वर नोंदवला तर कमाल तापमानातही वाढ दिसून आली. मंगळवारी ३०. ८ अंश असलेले कमाल तापमान बुधवारी ३२.२ वर पोहोचले. यामुळे बुधवारी दुपारी काहीसा चटका जाणवला. तर १५ डिसेंबरपर्यंत तापमानात जास्त घट होणार नाही. त्यानंतर पुन्हा पारा घसरून कडाक्याच्या थंडीचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली.
राज्यातील या भागात पावसाचा अंदाज?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरिबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांचा वेग वाढला असून कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे आज राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगील, सोलापूर, अहमदनगर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.