⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

वरगव्हान गावातील समस्यांनी ग्रामस्थ हैराण!

Chodpa News-जळगाव लाईव्ह न्यूज ।अमोल महाजन । चोपडा तालुक्यातील वरगव्हाण गावात घाणीचे साम्राज्य, निर्माण झाले असून गटारीचे पाणी चक्क रस्त्यांवरून वाहू लागले आहे. तर गावात स्वच्छ भारत मिशन योजनेतंर्गत १८ महिन्यांपूर्वी महिला व पुरुषांच्या साठी स्वच्छता गृह मंजूर करण्यात आले होते, परंतू, १८ महिन्याचा कालावधी उलटूनही स्वच्छतागृहचे काम अपूर्ण असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, गावातील समस्या तात्काळ न सोडवल्यास दि. १५ ऑगस्टला उपोषणाला बसणार असल्याचे बोलले जात आहे.

तालुक्यातील वरगव्हाण येथे दि. २७ डिसेंबर २०२२ रोजी एक भुमीगत गटार आणि कोंक्रेटिकरण चे मोठ्या थाटात भुमिपुजन करण्यात आले होते. परंतु, ७महिने उलटुनही सदर कामाचा थांग पत्ता नाही, शिवाय सरपंच निवड झाल्यापासुन गावातील गटार या केवळ 2 वेळेस काढल्या गेल्या असून अक्षरशः गटारीचे पाणी हे रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे गावातील ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या आधीही गंभीर प्रकारे गॅस्ट्रोची साथ लागून तब्बल चारशे लोक बाधीत झाले होते. ती शक्यता आताही बळावली आहे.

दरम्यान, ग्रामसेवक महाशय २० ते २५ दिवस गावात यायचं नावच घेत नाही, तसेच चक्क ग्राम पंचायत सदस्यांना घराचा उतारा भेटत नसल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे याबाबत इतरांचा विचारच करणे कठीण असून सरपंच हे सगळं होतं असतांनाही गावात काहीही समस्या नसल्याच्या आविर्भावात वागत असल्याचे बोलले जात आहे. तसेच यामुळे ग्रामस्थ वैतागले असून गावातील समस्या लवकरात लवकर सोडवल्या नाही तर 15 ऑगस्ट ला उपोषणाला बसण्याचा ईशारा ग्रामस्थांच्यावतीने यावेळी देण्यात आला आहे.