⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

दुर्दैवी : गव्हाला आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान

जळगाव लाईव्ह न्यूज | ३ एप्रिल २०२३ | यावल तालुक्यातील बोरावल बुद्रक शेत शिवारात मधमाश्यांच्या पोळ जवळ आगीचा टेंभा नेतांना गहूच्या शेतात ठिणगी पडल्याने शेतकर्‍याचा कापणी योग्य गहू जळून खाक झाला. वेळीच आग आटोक्यात आणली तरी शेतकर्‍याचे सुमारे 20 हजारांचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी दुपारी घडली.

शेतकर्‍याला मोठा आर्थिक फटका
बोरावल बुद्रुक, ता.यावल येथील शेतकरी जगन्नाथ उखर्डू कोळी यांचे गाव शिवारात शेत गट क्रमांक 121 असून या शेतात त्यांनी गव्हाची पेरणी केली आहे. गहु मळणी योग्य झाल्यानंतर या शेताजवळ असलेल्या झाडावरील मधमाश्यांचा पोळला काढण्याकरीता अज्ञात व्यक्ती आगीचा टेंभा घेवून जात असताना अचानक आगीची ठिणगी गहू पिकाजवळ पडताच आग लागली. यात हवा खुप असल्याने आगीने रुद्ररुप धारण केल्याने गहु जळून खाक झाला. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले मात्र तरीदेखील शेतकर्‍याचा सुमारे 20 हजार रुपये किंमतीचा गहू जळून खाक झाला. ग्रामस्थांच्या प्रयत्नाने आग विझविण्यात आली व मोठे नुकसान टळले.