जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२५ । 1993 च्या बॉम्बस्फोटांसह अनेक हाय-प्रोफाइल दहशतवादी प्रकरणांमध्ये सरकारी वकील राहिलेले उज्ज्वल निकम यांनी अभिनेता संजय दत्तबाबत धक्कादायक दावा केला आहे. ते म्हणाले की, जर अभिनेता संजय दत्तने एके-४७ ने भरलेल्या व्हॅनची माहिती पोलिसांना दिली असती तर १९९३ चे मुंबई बॉम्बस्फोट रोखता आले असते. या हल्ल्यात २६७ जणांना आपला जीव गमवावा लागला नसता.

उज्ज्वल निकम यांची नुकतीच राष्ट्रपतींच्या शिफारशीवरून राज्यसभेत नियुक्ती झाली आहे. यातच त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले की, “अबू सलेमने बॉम्बस्फोटाच्या एक दिवस आधी संजय दत्तच्या घरी शस्त्रांनी भरलेली व्हॅन आणली होती. अभिनेत्याने त्यातून काही हँड ग्रेनेड आणि बंदुका घेतल्या होत्या, पण त्याने फक्त एके-47 बंदूक स्वतःकडे ठेवली आणि बाकी सर्व परत केले. जर संजय दत्तने पोलिसांना त्या शस्त्रांनी भरलेल्या व्हॅनबद्दल माहिती दिली असती, तर पोलिसांनी तपास केला असता आणि 12 मार्च 1993 रोजी झालेले बॉम्बस्फोट थांबवता आले असते.”

याप्रकरणी संजय दत्तला शस्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आले आणि पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. अभिनेत्याने ही शिक्षा पुण्यातील येरवडा तुरुंगात पूर्ण केली. त्याला 2016 मध्ये सोडण्यात आले.निकम यांनी असाही दावा केला की, संजय दत्त निर्दोष आहे. त्याने बंदूक फक्त त्याला शस्त्रांचा शौक असल्यामुळे ठेवली होती. जरी कायद्याच्या दृष्टीने त्याने गुन्हा केला असला, तरी खरेतर तो एक साधा-सरळ माणूस आहे. संजयकडे एके-47 होती, पण त्याने कधीही त्याचा वापर केला नाही.












