⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

धक्कादायक : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन चिमुकल्यांना पळविले

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२१ । चिकनचे दुकान कुठे आहे, मला दाखव या बहाण्याने एका तरुणाने गोपाळपुरा येथून दोन चिमुकल्यांना पळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुनिल पडत्या बारेला (रा. चिरमलीया, ता. वारला, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) याने बालकांचे अपहरण केले आहे. सुनिल पडत्या बारेला (रा. चिरमलीया, ता. वारला, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) याने बालकांचे अपहरण केलेल्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध शनी पेठ पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन्ही चिमुकल्यांना घेऊन जाताना बारेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

बारेला याच्या ओळखीचे राजू दत्तू चव्हाण हे पत्नी राणी व मुले काजल, नंदिनी व प्रवीण या ती मुलांसह गोपाळपुऱ्यात राहतात. चव्हाण कुटंुबीय मुळचे शेलजा (ता. भिकनगाव, जि. खरगोन, मध्यप्रदेश) येथील रहिवासी आहेत. काही वर्षांपासून चव्हाण कुटंुबीय जळगावात राहत आहेत. चव्हाण हे शेतमजुरी करुन उदरनिर्वाह करतात. २७ रोजी दुपारी त्यांच्या घरी सुनील बारेला हा आला होता. त्याने चव्हाण यांच्या घरात मोबाइल चार्जिंगसाठी लावला. यानंतर चिकनचे दुकान कोठे आहे अशी विचारणा केली.

दरम्यान, तो चिकन घेण्यासाठी निघाला असता त्याच्यासोबत काजल चव्हाण व शेजारी राहणारा मयूर बुनकर हे दोघे बालक देखील गेले. बराच वेळ झाला तरी बारेला व दोन्ही बालके घरी न आल्यामुळे राणी चव्हाण यांनी चिकनच्या दुकानाकडे धाव घेतली. त्यावेळी हे तिघे दुकानाकडे आलेच नाही असे उत्तर चिकन विक्रेत्याने दिले. त्यामुळे राणी चव्हाण यांच्यासह परिसरातील लोकांनी दोन्ही बालकांचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाहीत. तसेच सुनील बारेला याच्या मुळ गावी तपास घेतला असता तो गेल्या १५ वर्षांपूर्वीच गाव सोडून गेल्याची माहिती मिळाली. सुनील बारेला यानेच दोन्ही बालकांचे अपहरण केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर राणी चव्हाण यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एलसीबीने मिळविले फुटेज

दरम्यान, या गंभीर प्रकाराची माहिती मिळाल्यावर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी गोपाळपुरा गाठत कुटुंबियांकडून माहिती जाणून घेतली. एलसीबीचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, प्रितम पाटील व नितीन बाविस्कर यांनी काही प्रमुख मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एका ठिकाणी बारेला दोघं मुलांसह कैद झाला आहे. त्यामुळे मुलांना त्यानेच पळविल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे एक पथक तपासासाठी रवाना झाले आहे.