जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आज त्यांची बदली करण्यात आली आहे. गुरुवारी राज्य शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या त्यात राऊत यांची नांदेड जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली. जळगाव जिल्हाधिकारी म्हणून लातूर मनपाचे आयुक्त अमन मित्तल यांची निवड करण्यात आली आहे.याच बरोबर राज्यातल्या ४४ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
नवी मुंबईचे महापालिका आयुक्त अभिजीत बागंर यांची ठाणे महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांची नवी मुंबई महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मनीष पाटणकर म्हैसकर यांची पर्यावरणीय आणि वातावरणीय बदल मंत्रालयाच्या प्रधान सचिव पदावरुन बदली करुन त्यांना मुख्य राजशिष्टाचार अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.याच बरोबर मराठी भाषा विभागाची अतिरिक्त जबाबदारी सुद्दा देण्यात आली आहे.

मिलिंद म्हैसकर यांची गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव पदावरुन बदली करुन त्यांना नागरी उड्डाण, मान्य प्रशासन विभाग, उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, तुकाराम मुंढे यांची राज्य मानवी हक्क आयोग मुंबई च्या सचिव पदावरुन राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.