⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

टू द पॉईंट, आमदार कसा ओळखावा ?

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२२ । जिल्हा परिषद मधे इतका घोटाळा झाला तरीही एकही झेडप्या पुढे येत नाही.म्हणून मी जनतेला अपील करतो कि,पुढील निवडणुकीत एकही झेडप्या रिपीट निवडून देऊ नका. जिल्ह्यातील आमदार सुद्धा नालायकच.एकाही आमदाराने हा बोगस शिक्षक भरतीचा प्रश्न हाती घेतला नाही.काय करतात हे चोर?रेती,राशन,दारू, आरटीओ चे हप्ते घेतात.वरून नाक लावतात,मला मंत्रीपद पाहिजे.आणि मंत्री बनलेले गुलाबराव पाटील तरी काय करतात?त्या माणसाची जबाबदारी आहे, जिल्ह्यातील प्रत्येक प्रशासकीय अनियमितता,अपहार वर नियंत्रण ठेवण्याची.पण हेच चोर असतील तर कोणाला सांगणार?हे पांच वर्षे चोरी करतात.निवडणुकीत दारू मटण पैसे देतात.भिकारडे लोक खाऊन पिऊन याच चोरांना मतदान करतात.इतके नालायक आमदार का निवडून द्यायचे? आमदार सुद्धा बदलले पाहिजे.

लोक विचारतात, चांगला माणूस पाहिजे.
आहेत ना!
कसे ओळखावे?
जे फक्त जनहिताचे काम करतात.चोरी करीत नाहीत.फुकट खाऊ घालत नाहीत.मताचे पैसे देत नाहीत.अशी माणसे तर रोज आपल्या डोळ्यासमोर असतात.तुम्ही भेटतात.ते भेटतात.पण ज्याच्या स्तनात दूध नाही त्याला लोक चांगले समजत नाहीत.मंडप टाकून भीक वाटणाऱ्यांना चांगले समजतात.असा हा भिकारडा मतदार ! म्हणून निवडतात ,चोर आमदार!
एक शेजारी म्हणाला, आमदार बदलू .पण तो सक्षम पाहिजे.
मी विचारले,सक्षम म्हणजे कसा?
म्हणे, लोकांना गाडी करून नेणारा पाहिजे.खर्चपाणी करणारा पाहिजे.कार्यक्रमाला दाबून वर्गणी देणारा पाहिजे.
म्हटले, नालायक माणसा!असा खर्च करण्यासाठी चोरी करावी लागते.रेतीमातीचे धंदे,दारूचे धंदे करावे लागतात.कोणी आपल्या शेतीमालाचे पैसे यासाठी वापरू शकतो का? हरामाची कमाई असेल तरच फुकट खाऊ घालील.कष्टाच्या पैशांनी कोणी कोणाला जेवण,दारू,मटण देऊ शकत नाही.
जळगाव जिल्ह्यातील मतदारांची मानसिकता बनली आहे,जो चोरी करुन आणील तोच मंडप घालून जेवण देईल.जो फुकटचे देतो,तोच चांगला.

अरे पण,भाकरी खातात तर थोडा विचार तरी करा.तुम्ही कष्टाचे पैसे असे फुकट खर्च करू शकतात का? तसा तो कष्टाचा पैसा मंडप,जेवण ,दारू साठी देऊ शकतो का?मुळीच नाही.असे कोणी करीत असेल तर नक्कीच,तो दारुचे दुकान चालवत असेल.रेती राशन चा ठेका असेल .व्याजाचा धंदा असेल.डान्सबार तरी चालवत असेल.बिल्डर तरी असेल.म्हणून तर खर्च करतो.रीक्षा चालवणारा,किराणा दुकान चालवणारा,चक्की चालवणारा,भाजी विकणारा, ट्युशन घेणारा माणूस, पेन्शन वर पोट भरणारा असा फुकट खर्च कसा करील?

जळगाव शहरातील आमदार सुरेश भोळे दोन वेळा सहज निवडून आले.ठिक आहे,पहिल्या वेळेस सुरेश जैन घरकुल घोटाळ्यात अडकले म्हणून जेलमध्ये होते.मतदारांना पैसे वाटता आले नाहीत.ज्यांना दिले त्यांनीच लाटून घेतले.सांगितले कि, आम्ही वाटले.इकडे भोळेंची यंत्रणा जोरात होती.घरोघरी पोहचली.शिवाय तिकडे मोदी बाबा,सर्वांना पंधरा लाख रोख देणार होते.लोक ही मुर्ख.जे दुधाचे बील कटकट करुन देतात,पेपरबील साठी महिना महिना फिरवतात,धड वीज बील वेळेवर भरत नाहीत,असे लोकांना कसे खरे वाटले,राम जाणे?कि मोदी बाबा पंधरा लाख फुकट देणार आहेत ? पण लोकांना खरे वाटले, म्हणून भाजपचा आमदार निवडून दिला. डॉ राधेश्याम चौधरी. माणूस चांगला आहे.गोड बोलतो.पण पैसे वाटत नाही.हिच तर मेख आहे.कांग्रेसचे लोक आरोप करतात,पक्षाने पैसे दिले ,तरीही वाटले नाही.खरे खोटे राम जाणे! पण पैसे वाटण्याची संकल्पना,कला, परंपरा कांग्रेसचीच आहे.भाजप ,सेना, राष्ट्रवादी ने शिकून घेतली.नाईलाज आहे.त्याशिवाय जळगाव चे लोक मत देत नाहीत.पैसा नाही वाटला,किंवा माल आणतांना उशीर झाला तर लोक चार वाजेपर्यंत मतदानाला बाहेर पडत नाहीत.घरूनच विचारतात,काहो !त्यांच्याकडचे आलेत,तुमचे बाकी आहेत.नाहीतर आम्ही मतदानाला नाही जाणार.बघा, लवकर इंतजाम करा.

ठिक आहे,झाली चूक एकदा.पण पुन्हा तिचं चूक.भोळेंनी एकही रस्ता बनवला नाही.नवीन कच्चा तर सोडाच पण जुना सुद्धा बनवला नाही.एकही खड्डा भरला नाही.तरीही पुन्हा आमदार निवडून दिले.काय मेरीट पाहिले लोकांनी? फक्त पैसा.पांचशे रुपयांत मत विकणाऱ्या लोकांनी आमदार प्रामाणिक असण्याची अपेक्षा तरी का करावी? लोकांना वाटलेले पैसे वसुल होईपर्यंत रस्ता कसा बनवेल?आमदारांच्या घरापासून अजिंठा रेस्ट हाऊस पर्यंत चिकणा रस्ता बनला आहे.तुमचे रस्ते बनवायला , पैसा काय झाडाला लागतो का? त्यासाठी काय काय धंदे करावे लागतात?हे तर पाहिले पाहिजे.चांगल्या कुटुंबातील माणूस,शेती सोडून चक्क दारू विकतो.दारू बनवणारा,दारू विकणारा माणूस चांगला विचार करू शकतो का?हे हरीविठ्ठलनगर ,पिंप्राळा,शिवाजीनगर ,जैनाबाद,मास्टर कॉलनी ,तांबापुरा मधील लोकांना नाही कळणार.पण जुने जळगाव,रथ चौक,बालाजी पेठ ,नवीपेठ, आदर्श नगर , मुक्ताईनगर ,रींग रोड वर राहाणाऱ्या चिकण्या चोपड्या लोकांना तरी कळले पाहिजे.रोज राममंदिरात, ओंकारेश्वर मंदिरात जाणाऱ्या,आसाराम बापूंचे प्रवचन ऐकणाऱ्या लोकांना तरी कळले पाहिजे.पण नाही.येथे मती मंद पडली आहे.निती बंद पडली आहे.म्हणून गती थंड पडली आहे.तरीही रस्ता बनवण्याची अपेक्षा ठेवता.चुकीचे आहे.जो मैट्रीक पास होत नाही तोच प्राचार्य बनवला. तर एम जे कॉलेज कशी चालेल?ही गुणवत्ता लोकांनी ओळखली पाहिजे.

जळगाव महापालिका.पन्नास नगरसेवक तद्दन गुंड आहेत.सट्टा चालवणारा,झन्नामन्ना चालवणारा,बायकांची धरसोड करणारा,खून करणारा माणूस येथे महापौर बनतो.ही काय गुणवत्ता झाली? आधी मतदार गुणवत्तेचे पाहिजे.तरच नगरसेवक गुणवत्तेचे निवडतील.तरच आमदार गुणवत्तेचे निवडतील.तरच रस्ते गुणवत्तेचे बनतील.
आमदारांचे घर ते अजिंठा रेस्ट हाऊस पर्यंत रस्ता चिकणा केला आहे.त्यांना तितकीच गरज वाटते.चंद्रकांतदादा पाटील व गिरीश महाजन तेथपर्यंतच येतात. अजिंठा रेस्ट हाऊस ते गिरणा टाकी.फक्त ४०० मीटर रस्ता.जुना रस्ता.त्याचे डांबरीकरण साठी डीएसआर प्रमाणे फक्त ३० लाख खर्च येतो.जळगांव महानगरपालिका आयुक्त , महापौर व येथील नगरसेवकांनी तोच रस्ता बनवण्यासाठी चक्क ९७ लाखाचा ठेका बिल्डर एल एच पाटील यांना दिला.आम्ही आक्षेप घेतला.आंदोलन केले.जेलमधे जाण्याच्या भीतीने उपरोक्त चोरांनी ठेका रद्द केला.विचार करा.एकाच रस्त्यावर चक्क ६७ लाखाचा अपहार?हे ६७ लाख आयुक्त, महापौर, नगरसेवक या चोरांनी वाटून घेतले असते.इतके सराईत चोरांना येथील लोकांनी पुन्हा निवडून दिले.म्हणे,हेच चोर पाहिजे.मग म्हणा, रस्ता असाच राहिला पाहिजे.२०१४ते आता २०२२ , तब्बल आठ वर्षात हा रस्ता डांबरीकरण केला नाही.तरीही चोर महापौर,चोर नगरसेवक येथे येऊन लोकांना ज्ञान पाजतात.म्हणे,भाजपवाले काम करू देत नाहीत.
मी पाहिले, नगरसेवक इतके गुंड आहेत कि,लोक समोर येत नाहीत.आलेले दूर पळून जातात.का ?म्हणे, नको .आपली बायको बाजारात जाते.पोरगी कॉलेज ला जाते.मला नोकरीला जावे लागते.अडवले,पळवले,ठोकले तर कोण मदत करणार? शहाणपणा करून, ही जोखीम नको.नाही बनला रस्ता तर आपले काय जातं?लोक वापरतात,तसे आपण ही वापरून घेऊ.एक तर नगरसेवक नालायक आहेत. त्यांच्या सोबत काळे काळे दाढीवाले,लाल लाल टिळा वाले, हातात कडीवाले,जीनची चड्डीवाले गुंड असतात.घरी येऊन दम दिला तर कोणीच दरवाजा उघडणार नाही.हे नगरसेवक शिवराम भाऊला ही दम देत असतील.पण हे सांगत नाहीत.
जे नगरसेवक दारूच्या दुकानात जाऊन हप्ते मागतात,तेच पुन्हा पुन्हा निवडून देत असाल तर कसा बनेल रस्ता? कसे बुजवतील खड्डे? मला वाटते, रस्त्यावरचे खड्डे कोणालाही दिसतात पण येथील लोकांच्या मेंदूतील खड्डे सुद्धा दिसले पाहिजे.आमच्या मेंदूत खड्डे असतील तर रस्त्यावर खड्डे असणारच.

… शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.