⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

केळी उत्पादकांना श्रावण पावला ! आता प्रतिक्विंटलला मिळतोय ‘इतका’ दर..

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२३ । जळगाव जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध आहे. मागील काही दिवसापासून केळीला कमी भाव असल्याने शेतकरी राजा निराश होता. त्यात जिल्ह्यातील काही भागात गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने केळी बागांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. दरम्यान, सध्या श्रावणमास सुरू झाल्याने केळी भावात तेजी आली.

क्विंटलमागे ३०० ते ५०० रुपयांची वाढ झाल्याने सध्या केळीला प्रतिक्विंटल १५०० ते १८०० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.

उत्तर भारतात आपल्यापेक्षा १५ दिवसांआधीच अधिक व श्रावण मासाची पर्वणी सुरू होत असते. यासाठी केळीची मागणी वाढली आहे. त्यामुळे केळीचे भाव तेजीत आहेत. मध्यंतरी एखादा आठवडा १८०० रुपयांपर्यंत स्थानिक बाजारपेठेतही केळी भावात तेजी आली होती. मात्र आठवडाभरानंतर सर्वसाधारण केळीमालाला १२०० ते १५०० रु. प्रतिक्विंटल भावात खरेदी सुरू आहे. तर दुसरीकडे दर्जेदार केळीला कमाल १८०० रु. प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे.

दरम्यान, रावेर तालुक्यात उन्हाळ्यात ‘केळीबागांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली होती. दुसरीकडे पावसाळ्याच्या तोंडावर सुमारे दोन-अडीच हजार हेक्टर क्षेत्रातील केळीबागा भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे केळी पट्ट्यातून केळीचं उत्पादन कमी आहे. वादळी वाऱ्यासोबत झालेल्या पावसामुळे केळीच्या अनेक पुर्णपणे उद्धवस्त झाल्या होत्या. त्यामुळे केळी बाजारात कमी प्रमाणात दाखल होईल अशी शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती.