⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर.. बहिणाईच्या जीवनप्रवासाची कथा सोप्या भाषेत..

जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर । हि ओळ वाचून तुमच्या डोळ्यांसमोर एक डोक्यावर पदर घेतलेली व जुन्याकाळातील चष्मा लावलेली वयस्कर बाईच चित्र उभं राहील. अगदी बरोबर त्या चित्रात दिसणाऱ्या कवयत्री बहिणाबाई चौधरी (Bahinabai Chaudhari) यांनीच हि कविता लिहली आहे. एकच कविता नाही तर अशा अनेक कविता बहिणाबाईंनी म्हटल्या आहेत. त्यातील काहीश्या जगासमोर आल्या तर काही फक्त कवयत्री बहिणाबाईंनी वेळेसोबत तिथंच सोडल्या कारण, बहिणाबाई अशिक्षित होत्या. म्हणून लिहून ठेवणं कदाचित त्यावेळी शक्य नव्हतं… खान्देशकन्या कवयत्री बहिणाबाई चौधरी यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

भाषेला कोणतं बंधन नसत, आपल्या मायबोली म्हणजेच खान्देशी भाषेतच बहिणाबाई कविता म्हणायच्या. बहिणाबाईंचा हा अमूल्य ठेवा आज बहिणाबाईंच्या जळगाव येथी घरात पाहायला मिळतो. बहिणाबाईंचा जन्म जळगाव जिल्ह्यातील असोदे या गावी १८८० मध्ये झाला. महाजन शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्या स्वतः पूर्णपणे निरक्षर असल्या तरी त्यांना प्रतिभेचे उपजत देणे लाभले होते. या निसर्गदत्त प्रतिभेच्या बळावर त्यांच्या काव्यरचना आधारित आहेत. बहिणाबाई चौधरी या शेतात काबाडकष्ट करणाऱ्या गृहिणी होत्या. शेतात काम करताना, जात्यावर दळण दळताना आणि चूल फुंकताना त्यांच्या तोंडातून आपोआप ओव्या बाहेर पडत होत्या.

नथुजी आणि बहिणाबाईंना ओंकार, सोपान आणि काशी अशी तीन अपत्ये झाली. जळगावच्या प्लेगच्या साथीत ओंकारला कायमच अपंगत्व आले. वयाच्या तिसाव्या वर्षी बहिणाबाईंना वैधव्य आले. बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. तर काही कविता पुत्र सोपानदेव चौधरी यांनी आणि काही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या. शेती आणि घरकाम करताना त्या उत्स्फूर्तपणे ‘लेवा गणबोली’ मध्ये कविता आणि गाणी रचायच्या.

सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक नातेवाईक एकत्र आल्यावर वेळोवेळी कविता उतरवून ठेवत होते. त्यांच्या जवळपासचे कोणीतरी त्या लिहून घेत होते. अशा प्रकारे त्यांच्या कविता जन्माला आल्या. सुप्रसिद्ध कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे पुत्र होत. एकदा सोपानदेवांनी आपल्या आईच्या कविता आचार्य अत्रे यांना दाखविल्या. अत्रेंना त्या इतक्या आवडल्या की, त्यांनी त्या प्रसिद्ध करण्याचा आग्रहच धरला आणि बहिणाबाईंच्या कविता प्रकाशझोतात आल्या.

कवयित्री बहिणाबाई चौधरींचे नाव आज अजरामर झाले असून अभ्यासक्रमात देखील त्यांच्या कविता घेतल्या जातात. कान्हदेशचे वैभव असलेले उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ देखील आज कवयत्री बहिणाबाईंच्या नावाने ओळखले जाते. जळगावात बहिणाबाई चौधरींच्या नावाने एक छान असा बगीचा देखील आहे. बहिणाबाई चौधरी जळगावच्या असल्या तरी केवळ राजकीय इच्छाशक्तीमुळे आजही त्यांचे स्मारक अपूर्णवस्थेत आहे. बहिणाबाईंच्या मूळ गावी असोदा येथे त्यांचे भव्य स्मारक आणि संग्रहालय प्रस्तावित असून आजही ते अपूर्णावस्थेत आहे हि मोठी शोकांतिका आहे.