⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

गोद्री कुंभात पूज्य धोंडीराम बाबा आणि आचार्य चंद्रबाबा यांच्या मूर्तींची प्राण प्रतिष्ठा होणार

जळगाव लाईव्ह न्यूज | २० जानेवारी २०२३ | जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील “गोद्री” येथे अ. भा. हिंदू गोर बंजारा व लबाना– नायकडा समाज कुंभ 25 ते 30 जानेवारी दरम्यान होत आहे. या कुंभमेळ्याला राष्ट्रीय स्वरूप आले आहे. कुंभासाठी अनेक राष्ट्रीय संत महात्मे आणि विशेष अतिथी येणार आहेत. त्यामुळे जामनेर पंचक्रोशीतील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. ज्या गोद्री ग्राम मध्ये कुंभ होत आहे ते पूज्य धोंडीराम बाबाजी आणि आचार्य चंद्र बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले ठिकाण आहे व त्यांचा थेट गुरुनानक देव जी यांच्याशी संबंधित मोठा इतिहास आहे. त्यामुळे कुंभा दरम्यान लबाना समाजातील श्रद्धास्थान असलेल्या पूज्य धोंडीराम बाबा आणि आचार्य चंद्र बाबा यांच्या मंदिराची गोद्री येथे उभारणी झालेली असून मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

गोद्री येथे पूज्य धोंडीराम बाबाजी यांचा मोठा इतिहास आहे. पूज्य धोंडीराम बाबा यांचा जन्म 1803 मध्ये नानक जवळा, ता. पुसद जि. वाशीम येथे झाला. 1872 साली ते गोद्री येथे स्थायिक झाले होते. बाबाजींकडे 10 हजार गाई व एक हजार एकर शेती होती. त्यांचेकडे गोधना सोबत पाचशे ते सहाशे म्हशीही होत्या. त्यांचा मुख्य व्यवसाय गोपालन व मिठाचा व्यापार होता. हा समाज गोसेवक समाज असून असून गाय भाकड झाली तरी तिला कसाईला विकत नाही. गाय मेली तर तीला जमिनीत पुरले जाते.

धोंडीरामबाबा हे आयुर्वेदिक औषधीचे जाणकार होते. त्यांच्याकडे पंचक्रोशीतील अनेक रुग्ण औषधीसाठी येत असत. दुधाचे स्टॉल लावून वाटसरुंना मोफत गायीचे दूध देत असत. आज धोंडीरामबाबा यांची चौथी पिढी गोद्रीला आहे. नानकजवळा ता. पुसद जिल्हा वाशीम येथे बाबाजिंचा मळा आहे. गोद्रीमध्ये धोंडीरामबाबा यांच्या चौथ्या पिढीतील 50 घरांचा गोतावळा ( नातेवाईकांची 50 घरे ) आहे.

याच ठिकाणी दुसरी मूर्ती प्राण प्रतिष्ठा प.पू.आचार्य श्री चंद्रबाबा यांची होणार आहे. ज्यांची स्थानिक लबाना समाजात मोठी श्रद्धा आहे. आचार्य चंद्रबाबा हे गुरुनानकदेव आणि सुलक्खणी देवीचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म 1494 मध्ये पंजाबच्या सुल्तानपूर लोधी येथे झाला. वयाच्या 11 व्या वर्षी धार्मिक ग्रंथ अध्ययनसाठी श्रीनगर येथील आचार्य पुरुषोत्तम कौल यांच्या गुरुकुलात ते गेले होते. यानंतर अविनाशी मुनी यांच्याकडून दीक्षा मिळाली. त्यांनी एकांत साधनाही केली तसेच त्यांनी ऐतिहासिक उदासी ( उदासीना ) सांप्रदायाची स्थापना केली.

आचार्य चंद्रदेव बाबा यांनी सिंध ,बलुचिस्तान, काबूल ,कंधार आणि पेशावर दरम्यान प्रवास करून विविध सांप्रदायाच्या, पंथांच्या पवित्र व्यक्तींशी संवाद साधला. त्यांनी हरिद्वार ,कैलास मानसरोवर, नेपाळ आणि भूतान,आसाम ,पुरी ,सोमनाथ, कन्याकुमारी आणि सिंहली दौरा केला. जाती आणि पंथात भेदभाव केला नाही. ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांनी सांप्रदायातील मतभेद कमी करण्यासाठी आदि शंकराचार्य यांच्या उपदेशानुसार गणेश ,सूर्य, विष्णू, शिव आणि शक्तीला लोकप्रिय बनविले आणि सत्य, संतोष, क्षमा, आत्म अनुशासन आणि मानवजातीची एकता हा उपदेश केला.

प.पू. श्री चंद्रबाबा यांनी कर्तारपुर (पाकिस्तान) येथे गुरुनानक देव यांचे स्मारक बनविले त्याला डेराबाबा नानक (पाकिस्तान) नावाने ओळखले जाते.त्यांचा उदासी आश्रम ,जालंधर जो वर्तमानकाळात स्वामी शांतानंदद्वारे संचलित आहे . येथे श्री चंद्रबाबा यांच्या सर्व उपदेशांचे प्रचार प्रसार चे कार्य होत असते.

बाब मख्खन शहा लबाना हे लबाना समाजाचे मुख्य पूर्वज समजले जातात. ते रेशीम आणि मसाल्याचा व्यापार करणारे होते. व्यापार दरम्यान शीख बांधव त्यांच्यासोबत काम करत होते . दरम्यान समुद्री वादळात जहाजे अडकली असता जो वादळातून जहाजे सुखरूप बाहेर काढेल त्याला 500 मोहर देण्याची अरदास त्यांनी केली. तसे घडले आणि ते गुरु तेगबहादूर होते. त्यामुळे लबाना समाज आणि गुरुनानक देव अशी ऐतिहासीक पार्श्वभूमी या कुंभाला आहे.