⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

भारतीय जनता पक्ष केवळ आणि केवळ महाराष्ट्राला बदनाम करायचा प्रयत्न करतोय – उद्धव ठाकरे

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२२ । महाराष्ट्र गेल्या अडीच वर्षापासून प्रचंड प्रगती करतोय. स्टार्ट अप मध्ये महाराष्ट्र नंबर १ राज्य बनले आहे. नवे नवे व्यवसायिक महाराष्ट्रात येत आहेत. असं असूनही भारतीय जनता पक्ष केवळ आणि केवळ महाराष्ट्राला बदनाम करायचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाला जिंकायचा होता. मात्र त्यांना तो जिंकता येत नाही यासाठी ते महाराष्ट्र विद्रूप करायचा प्रयत्न करत आहेत. असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.

जेव्हा १ मे रोजी आम्ही महाराष्ट्र दिन साजरा करत होतो तेव्हा भाजपच्या सभेत फडणवीस चुकून बोलून गेले कि त्यांना मुंबई स्वतंत्र करायच आहे. त्यांच्या मालकाची इच्छा बोलून गेले की आम्ही मुंबई स्वतंत्र करणार. तुमच्या मालकासकट तुमच्या सतराशे साठ पिढ्या आल्या, तरी इथल्या मर्द मावळ्यामधे जिवंतपणा आहे. मुंबई आंदण म्हणून मिळालेली नाही, मिळवलेली आहे. मुंबईचा लचका तोडण्याचा जो प्रयत्न करेल, त्याचे तुकडे करू अश्या शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली

छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करून उद्धव ठाकरे यांनी आजच्या सभेची सुरुवात केली. यावेळी त्यांनी मास घातला नव्हता. ते मास्क काढून म्हणाले की तुमच्याप्रमाणे मलाही आज मुक्त वाटतय आणि मी देखील बर्‍याच दिवसांनी मैदानात उतरलो आहे.

त्यावेळी ते म्हणाले कि, मी काही दिवसांपूर्वी गदा हातात धरली होती. त्यावेळी त्यांच्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की शिवसेनाही गधाधारी आहे. हो आम्ही गधाधारी होतो अडीच वर्षापूर्वी आम्ही गध्याला सोडून दिले अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.