⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

शेतकऱ्यांनो.. रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी हवंय? ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज सादर

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२२ । कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांचे अधिपत्याखालील जळगाव जिल्हा लाभक्षेत्रातील गिरणा मोठे प्रकल्प, तालुका नांदगाव वरील पांझण डावा कालवा तालुका नांदगाव वरील पांझण डावा कालवा तालुका चाळीसगाव, जामदा डावा कालवा व जामदा उजवा कालवा तालुका भडगाव व निम्न गिरणा कालवा तालुका एरंडोल व धरणगाव तसेच जळगाव जिल्ह्यातील अधिसूचित नदी नाले तसेच गिरणा नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजनांच्या पाण्याचा फायदा घेणाऱ्या बागायतदारांनी सुरु झालेल्या रब्बी हंगामासाठी 31 डिसेंबर पर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी केले आहे.

सर्व बागायतदारांनी आपले नमुना नं. 7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात 31 डिसेंबर पर्यंत सादर करावेत. बागायतदारांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजुरी देण्यात येईल. बागायतदांरानी आपआपल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात, पाणी अर्ज स्विकारण्याची मुदत पुरेशी देण्यात आलेली आहे. मुदती नंतर आलेल्या पाणी अर्जाचे मंजुरी बाबत उपलब्ध पाणीसाठा व अगोदर आलेली मागणी विचारात घेवून नंतरच / ना मंजुरी चा विचार करण्यात येईल.

मंजुरी व पाणी पुरवठ्याबाबत अन्नधान्ये, भुसार, चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रितसर पास मिळालेशिवाय पाणी घेऊ नये. थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी व व्याज भरणे आवश्यक आहे. पाणी नाश / पाळी नसतांना पाणी घेणे/ मंजुरी पेक्षा अधिक क्षेत्र भिजविणे/ विहीरीवरील पिकास कालव्याचे पाणी घेणे/ व पाटमोट संबंध दूर न करणे वगैरे गुन्हे करणा-या बागायतदारांनी नियमानुसार पंचनामे करणेत येतील व दंडाचे दराने आकारणी करण्यात येईल.

टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पीक नुकसान भरपाई देता येणार नाही. जाहिर निवेदना मध्ये नमुद केलेल्या विहीत दिनांकापर्यत पाणी अर्ज शाखा कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयास देऊन पोहोच पावती घेतली पाहिजे. शासनाने काही सवलती दिल्यास त्यानंतर जाहिर प्रकटनाव्दारे प्रसिध्द करण्यात येईल.

लाभक्षेत्रातील तसेच कालव्यापासून 35 मीटर अंतराच्या हद्दीतील विहिरींबाबत नमुना 7 (ब) मागणी अर्ज न करता बिनअर्जी क्षेत्र भिजविण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पध्दतीने पाणी देण्यात येईल. जळगाव जिल्हयातील मोठया प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी पाणी आरक्षित केलेले आहे. आरक्षित पाणीसाठा वगळता उपलब्ध पाणी सिंचनासाठी संबंधीत उपविभागीयव्दारे शेतीसाठी पाणी अर्ज स्वीकारले जातील. असेही कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.