खुशखबर : …तर रेल्वेचे मासिक पास सुरु होणार

जुलै 28, 2021 2:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२१ । कोरोना पार्श्वभूमीवर बहुतांश रेल्वे सुरु असल्या तरी काउंटर तिकीट आणि मासिक रेल्वे पास बंद आहेत. दररोज अपडाऊन करणाऱ्या चाकरमान्यांचे यामुळे हाल होत आहे. दरम्यान, आता ज्या नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत अशा नागरिकांना मासिक पास उपलब्ध करून देण्याबाबत शासन रेल्वे प्रशासनाला परवानगी देण्याचा लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती रेल्वेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. 

new-trains-from-bhusawal-to-surat-and-nandurbar

गेल्या वर्षी कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातून धावणाऱ्या सर्व मार्गावरच्या पॅसेंजर बंद ठेवल्या आहेत, तर सध्या कोरोना काळात ज्या विशेष गाड्या सुरू आहेत, त्या गाड्यांना जनरल तिकीट व मासिक पासही बंद केला आहे. प्रवाशांना तिकीट आरक्षण करूनच प्रवासाची सक्ती करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतरही रेल्वे प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकासांठी पॅसेंजरची सेवा सुरू न केल्यामुळे नाशिक व मुंबईकडे जाणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. 

दरम्यान, पॅसेंजरच्या सेवांबाबत भुसावळ विभागाचे डीआरएम विवेक कुमार गुप्ता यांनी सांगितले की, भुसावळ विभागातून सुटणाऱ्या पॅसेंजर या राज्याअंतर्गत धावत असल्यामुळे, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या सुरू करायच्या की नाही, हे शासन ठरविणार आहे. पॅसेंजर सुरू करण्याबाबत आम्ही शासनाकडे परवानगी मागितली आहे. शासन जेव्हा परवानगी देईल, तेव्हा आम्ही भुसावळ विभागातील सर्व पॅसेंजर सुरू करणार असल्याचे सांगितले.

लवकरच मासिक पासची सुविधा

सध्या मुंबईतही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना लोकलच्या प्रवासावर बंदीच ठेवण्यात आली आहे. परंतु, राज्य शासनाने आता कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना निर्बंधांमधून सूट देण्याचा विचार करत आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून शासनाने परराज्यातून विमानाने येणाऱ्या नागरिकांना कोरोनाचे दोन्ही डोस घेतले असतील, तर अशा नागरिकांना आरटीपीसीआरची चाचणी करण्याची गरज नसल्याचे आदेश काढले आहेत. त्याच धर्तीवर आता शासन लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाही मासिक पासची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या विचाराधीन आहे. याबाबत रेल्वेचे अधिकारी व राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now