⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

सुप्रिया सुळेनंतर आता शरद पवारांच्या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या, म्हणाले राष्ट्रवादीत..

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२३ । महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने घडामोडी घडत असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय शिजत आहे यावरून सर्वांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांना सोडून अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सामील झाल्याने राष्ट्रवादीच्या (NCP) दोन्ही गटांमध्ये कमालीची तणाव निर्माण झाली होती, मात्र याच दरम्यान आता सुप्रिया सुळेनंतर (Supriya Sule) शरद पवारांच्या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

काल गुरुवारी माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणतीही फूट नाही दादा आमचेच नेते आहेत असे वक्तव्य केले होते. त्यानंतर याबाबत माध्यमांनी पवार यांना छेडले असता सुप्रिया सुळे यांच्या मताचे शरद पवार यांनी समर्थन केले.

शरद पवार यांनीही अजित पवार हे आमचेच नेते असल्याचं म्हटलं आहे. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादीत फूट पडलीच नसल्याचा दावाही शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. शरद पवार यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीत नेमकं घडतंय काय? असा सवाल केला जात आहे. शरद पवार हे बारामतीत मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी राजकीय धुरीणांनाही बुचकळ्यात पाडेल असं विधान केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये सभा होणार आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. लोकशाहीत सभा घ्यायला अडचण नाही. त्याबद्दल चिंता नाही. लोक जाहीर सभा घेऊन भूमिका मांडत असतील तर त्याचा आनंद आहे. त्यामुळे जनतेला कळेल सत्य काय आहे. त्यामुळे कोणीही सभा घेऊन भूमिका मांडत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो, असं पवार यांनी म्हटलं आहे.