⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

अजितदादांना फटकारले, फडणवीसांचे कान टोचले; जळगावात शरद पवारांची जोरदार फटकेबाजी

जळगाव लाईव्ह न्यूज | ५ सप्टेंबर २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जळगाव शहरात पहिल्यांदाच जाहीर सभा होत आहे. या सभेत ते काय बोतलात याकडे जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सभेआधी झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी अजित पवार यांना फटकारत देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याच्या मागणीवरही तिखट भाष्य केलं. यावेळी शरद पवार यांनी मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्याच्या मुद्यावर भाष्य केले. ओबीसी समाजाचा आताचा आरक्षणाचा जो कोटा आहे, त्यामध्ये आणखी वाटेकरी करणं, हे समाजासाठी अन्यायकारक आहे, असं काही लोकांचं म्हणणं आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असेही ते म्हणाले.

जालन्यात मराठा मोर्चावर लाठीमार करण्याचे आदेश आमच्याकडून देण्यात आल्याचे सिद्ध झाले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी, तिघेही राजकारणातून संन्यास घेऊ. मात्र, हे आरोप सिद्ध करता आले नाहीत तर विरोधकांनी राजकारणातून संन्यास घ्यावा, असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. यावर भाष्य करतांना शरद पवार म्हणाले की, तिथे लाठीहल्ला झाला. या घटनेचे जे काही व्हिडिओ दाखवले जात आहेत, त्यामध्ये पोलीस लाठीहल्ला करताना दिसत आहेत. आता तो लाठीहल्ला करण्याच्या सूचना कोणी दिल्या, का दिल्या, त्याची गरज होती का, या सगळ्याचे स्पष्टीकरण सरकारनेच द्यावे. कारण यंत्रणा तुमच्या हातात आहेत, आमच्या हातात नाहीत, असे शरद पवार यांनी म्हटले.

मराठा मोर्चावरील लाठीमाराची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा आंदोलक करत आहेत. याविषयी शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, त्यांनी माफी मागितली ना. म्हणजे लाठीहल्ला कोणी केला, काय केलं, याबाबत थोडीतरी स्पष्टता आली आहे. बाकी फडणवीसांनी राजीनामा द्यावा की नाही, याचं उत्तर सरकारने द्यावे. देवेंद्र फडणवीस ज्या गोवारी प्रकरणाचा दाखला देतात त्यात तत्कालीन आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड व मुंबईतील एका घटनेत आर.आर. पाटील यांनी राजीनामा दिला होता. पूर्वीची दोन उदाहरणं बघितली तर मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. आता त्यामधून कोणी काही प्रेरणा घेतली तर राजीनाम्याबाबत विचार करता येईल, असे सूचक भाष्य शरद पवार यांनी केले.