⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

लग्नाच्या सातव्याच दिवशी वधू मानलेल्या भावासह रोकड घेऊन पसार

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२२ । हल्ली लग्नासाठी नवरदेवांना मुली शोधून देण्याच्या नावाखाली पैसे घेत त्यांची फसवणूक होत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अशातच यावल तालुक्यातील किनगाव येथील २९ वर्षीय तरुणाला लग्नाच्या बहाण्याने सव्वालाख रुपयाचा चुना लावून लग्नाच्या सातव्याच दिवशी वधू मानलेल्या भावासह पसार झाली आहे. या प्रकरणात फसवणूक केली म्हणून वधूसह तिच्या मानलेल्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

नेमका काय आहे प्रकार?

यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील धनंजय हिरालाल सोनार याचे अंजाळे येथील जीवन सुरेश पंजे यांच्या ओळखीचे यशवंत ऊर्फ दादू विजय पाटील (रा. सांगवी खुर्द) यांची मानलेली बहीण सरिता प्रकाश कोळी (रा. अंजाळे) हिच्यासोबत विवाह निश्चित झाला होता.

या विवाहासाठी सव्वालाख रुपये द्यावे लागतील व लग्नाचा खर्च मुलाला करावा लागेल, असे यशवंत ऊर्फ दादू याने सांगितले होते. त्यानुसार सुरुवातीला १० हजार रुपये दिले होते. नंतर किनगाव येथे नवरी मुलीचा बस्ता फाडला. यशवंत पाटील याला पुन्हा २५ हजार दिले. नंतर १४ डिसेंबर २०२१ रोजी देहू-आळंदी (जि. पुणे) येथील अलंकापुरी मंगल कार्यालयात लग्न झाले. लग्नानंतर लागलीच पुन्हा ५० हजार रुपये दिले.

लग्नाच्या सात दिवसांनंतर यशवंत पाटील हा फिर्यादी धनंजयच्या घरी होता. सरिताला तिच्या आईला भेटण्यासाठी घेऊन जातो असे सांगितले. यानंतर तो सरिताला घेऊन गेला. मात्र, तो परत आला नाही. वारंवार फोन करून, शोध घेऊनदेखील सरिता व यशवंत सापडले नाही. या प्रकरणात फसवणूक व ९९ हजार रुपये लुबाडल्याचे लक्षात येताच धनंजय सोनार याने शुक्रवारी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हे देखील वाचा :