⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न, अपहरणात वाढ; वाचा गृह विभागाचा धक्कादायक अहवाल

जळगाव लाईव्ह न्यूज| २४ जुलै २०२३। महिलांविरुद्ध वाढणाऱ्या गुन्ह्यांमुळे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशभरातून महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या बातम्या समोर येत असतानाच महाराष्ट्रात देखील महिलांच्या अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये २२ टक्क्यांनी वाढ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गृह विभागाच्या आहवालात याबद्दल माहिती देण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार राज्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना सर्वाधिक आहेत, तसेच मागील तीन वर्षांत महिलांविरोधातील झालेल्या गुन्ह्यांची संख्या १७,८८५ एवढी आहे.

महत्वाची बाब म्हणजे, राज्यात महिलांच्या अपहरणाच्या गुन्ह्यांत न्यायालयातून सुनावणी पूर्ण होऊन गुन्हे सिद्ध झालेल्यांचे प्रमाण हे अत्यल्प आहे. अशा प्रकरणांमध्ये बहुतांश गुन्ह्यांमध्ये आरोपी निर्दोष सुटले आहेत. ३३ गुन्ह्यांची सुनावणीनंतर २८ जण निर्दोष सुटले. तर फक्त पाच जणांना शिक्षा झाली असे आकडेवारीतून उघड झाले आहे.

सध्या सुरु असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा होणार आहे. त्यावेळी या मुद्द्यावर विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. गृह विभागाचा गुन्हेगारी विषयक अहवालामध्ये बलात्कार, अपहरण, विनयभंग, छेडछाड, हुंडाबळी, अमलीपदार्थ, बनावट नोटा अशी सर्वच आकडेवारी असून राज्याची स्थिती गंभीर असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे प्रमाण सर्वाधिक असून मागील चार वर्षांत तीन हजार ४८७ महिलांचे अपहरण झाले आहे, त्यामध्ये १८ वर्षांखालील तीन हजार ४५९ मुलींचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महिलांवरील अत्याचाराच्या संबंधित दाखल झालेल्या गुन्ह्यात २०२१ अखेरच्या तुलनेत २०२२मध्ये ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये जून २०२२ अखेरच्या तुलनेत जून २०२३मध्ये दोन टक्क्यांनी घट झाली. महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये जून २०२२ अखेर जून २०२३ अखेर २८९ गुन्ह्यांची घट झाली पण, तसेच अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.