⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

संजय राऊत गुलाबराव पाटलांना म्हणाले, फक्त परत जाऊन दाखवा…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २० एप्रिल २०२३ | माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे २३ एप्रिल रोजी जळगाव जिल्हा दौर्‍यावर जाणार आहेत. या दौर्‍यात उध्दव ठाकरेंची पाचोरा येथे विराट सभा होणार आहे. शिवसेना फुटल्यानंतर उध्दव ठाकरे प्रथमच जळगाव जिल्ह्यात येणार असल्याने या सभेची ठाकरे गटाकडून जय्यत तयारी सुरु आहे. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी या दौर्‍याचे स्वागत केले आहे मात्र त्याचवेळी खासदार संजय राऊत यांना इशाराही दिला आहे. त्यावर राऊत यांनी पटलवार केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

माजी आमदार स्वर्गीय आर.ओ.पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरणाच्या निमित्ताने येत्या २३ एप्रिलला उद्धव ठाकरे पाचोरा येथे येत आहेत. यावेळी उध्दव ठाकरेंची जाहीर सभा देखील होणार आहे. माजी आमदार स्वर्गीय आर.ओ.पाटील यांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी या सभेचं आयोजन केलं आहे. या सभेबाबत बोलतांना गुलाबराव पाटील म्हणाले की, या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरेंचं स्वागतच आहे, परंतु, संजय राऊतांनी या सभेत चौकटीत राहून बोलावं, अन्यथा सभेत घुसणार आहे, असं थेट आव्हान गुलाबराव पाटील यांनी दिले.

गुलाबराव पाटील म्हणाले की, आर.ओ.पाटील यांचे माझ्यावर फार उपकार होते. त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी उद्धव ठाकरे येत आहेत. आर.ओ.पाटील यांचे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर पहिल्यापासून संबंध होते. त्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे येत आहेत. पुतळ्याचं अनावर करण्यासाठी येत असतील, तर जिल्ह्यात उद्धव ठाकरेंचं स्वागत आहे. पण, सभेत संजय राऊतांसारख माणूस माझ्यावर बोलत असेल, तर मी एसपींना पत्र देणार आहे, त्यांनी चौकटीत राहून बोलावं. अन्यथा सभेत घुसणार आहे, असा इशारा गुलाबराव पाटलांनी दिला आहे.

गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यावर संजय राऊतांना आत पत्रकार परिषद प्रश्न विचारण्यात आला. घुसा घुसा. तुम्ही आम्ही वाट बघत आहोत. घुसा आणि परत जाऊन दाखवा असं प्रतिआव्हान राऊतांनी गुलाबराव पाटलांना दिलं आहे. आज मुंबईत पत्रकारांशी ते बोलत होते. राऊत व पाटील यांच्या वाक्युध्दामुळे सभे आधीच राजकीय धुराळा उडाला आहे. शिवसेना फुटल्यानंतर सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्यातून बसला. कारण जिल्ह्यातील सर्व आमदारांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे या सभेत उध्दव ठाकरे काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.