⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

संजय राऊतांना झटका ; 22 ऑगस्टपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावणी

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२२ । अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केलेल्या शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना आज सोमवारी मुंबईतील विशेष न्यायालयात हजर केले. यावेळी संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊत यांना ३१ जुलैला अटक करण्यात आलेली होती. त्यांच्या ईडी कोठडीचा कालावधी आज संपत असल्याने न्यायालयात हजर करण्यात आले होते. आज तरी संजय राऊत यांना न्यायालयाकडून दिलासा मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. मात्र त्यांना आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, त्यांना ईडीच्या कोठडीत जी काही परवानगी दिली आहे, ती तुरुंगातही देण्यात यावी.राऊत यांना घरचे जेवण आणि औषध द्यावे, असे वकिलाने सांगितले. त्याचवेळी न्यायालयाने राऊत यांचा वैद्यकीय कागद पाहिला आणि ते पाहून राऊत यांना हृदयविकाराचा त्रास असल्याचे समजल्यामुळे त्यांना तुरुंगाच्या कोठडीत घरचे जेवण देण्यात यावे आणि त्यांची औषधेही तुरुंगातच देण्यात यावीत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

दरम्यान पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची देखील दोन दिवसांपूर्वी चौकशी करण्यात आली आहे. त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यानंतर त्या ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. पत्रा चाळ प्रकरणात त्यांची देखील चौकशी करण्यात आली आहे.  वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून काही मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप ईडीच्या वतीने करण्यात आला होता. या प्रकरणात वर्षा राऊत यांची चौकशी करण्यात आली. पत्रा चाळमधील काही भूखंड हा खासगी बिल्डरला विकून त्यामधून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. आता याच प्रकरणात ईडीकडून संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे.