⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

रक्षा खडसेंचा केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेश हा..; ‘सामना’तून गिरीश महाजन आणि फडणवीसांवर टीका

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२४ । देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी काल रविवारी तिसऱ्यांदा शपथ घेतली असून त्यांच्यासोबत अनेक मंत्र्यांना शपथ दिली गेली. यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांची सून भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा नव्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला असून काल रविवारी रक्षा खडसे यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र यावरून आज ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

रक्षा खडसे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेश हा महाराष्ट्रातील फडणवीस (Devendra Fadnavis) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या कपटी राजकारणाला दिल्लीने लगावलेली चपराक आहे. त्यासाठी विनोद तावडे यांनी विशेष श्रम घेतल्याचे दिसत आहे, असे भाष्य ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आले आहे. महाराष्ट्रात आम्ही ठरवू तेच मंत्री होतील, असे देवेंद्र फडणवीस वगैरे लोकांना वाटत होते. यावेळी ते घडले नाही.

काय म्हटलं आहे अग्रलेखात
बहुमत गमावलेल्या भाजपने ‘एनडीए’चा पिसारा लावून सत्ता स्थापन केली आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ रविवारी संध्याकाळी घेतली. हे सरकार मोदींचे नसून आता ‘रालोआ’ म्हणजे एनडीएचे आहे, असे मोदी वारंवार आपल्या भाषणातून सांगत आहेत. नितीश कुमार व चंद्राबाबू यांना खूश करण्याची व मिठय़ा मारण्याची एकही संधी मोदी यांनी गेल्या सात दिवसांत सोडली नाही. मोदी पुन्हा पंतप्रधान झाले व त्यांच्याबरोबर भाजप आणि घटक पक्षांतील काही सदस्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यात अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान, मनहरलाल खट्टर, पीयूष गोयल, ज्योतिरादित्य शिंदे अशी नेहमीची नावे आहेत.

शिंदे गटाचे प्रताप जाधव यांचे घोडे गंगेत न्हाले. रामदास आठवले हे आहेतच. महाराष्ट्रातून रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांना संधी मिळाली. खडसे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेश हा महाराष्ट्रातील फडणवीस, गिरीश महाजन यांच्या कपटी राजकारणास दिल्लीने दिलेली चपराक आहे व त्यासाठी विनोद तावडे यांनी विशेष श्रम घेतलेले दिसतात. महाराष्ट्रात आम्ही ठरवू तेच मंत्री होतील असे फडणवीस वगैरे लोकांना वाटत होते. ते यावेळी घडले नाही. नारायण राणे, भागवत कऱ्हाड यांना मंत्रिमंडळातून नारळ दिला आहे.

चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांना मोदी-शाहांची भीती; ‘सामना’तून जोरदार टीका
केंद्रीय मंत्रिमंडळात तेलुगू देसम आणि जनता दल युनायटेडचे मंत्री समाविष्ट केले आहेत. पण तेलुगू देसम दोन मुख्य मागण्या आहेत. एक म्हणजे अमित शाह यांच्याकडे गृहमंत्रीपद असता कामा नये व लोकसभेचे स्पीकरपद तेलुगू देसमकडे असावे. या दोन्ही मागण्या म्हणजे मोदी सरकारचे कान आणि नाक कापण्यासारख्या आहेत. तेलुगू देसमला अशी भीती वाटणे स्वाभाविक आहे. कारण सरकार स्थिरस्थावर झाल्यावर अमित शाह हे त्यांचा जुनाच खेळ सुरु करतील व संसदेतला तेलुगू देसम पक्ष फोडतील. नितीश कुमार यांनाही तेच भय आहे. त्यामुळे लोकसभेच्या ‘स्पीकर’पदी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा नेता असावा, अशी मागणी जोर धरत आहे. याचा अर्थ नवे सरकार हे अविश्वासाच्या पायावर बनत आहे. मोदी हे रालोआच्या नेत्यांना मिठ्या मारण्याचे नाटक करीत असले तरी त्यामागे त्यांचा स्वार्थ आहे. हे लोक विश्वास ठेवण्यासारखे नाहीत असेच नितीश व चंद्राबाबूंना वाटत आहे आणि हेच सरकारच्या अस्थिरतेवर शिक्कामोर्तब आहे, असा अंदाज ‘सामना’तून व्यक्त करण्यात आला आहे.