जळगाव लाईव्ह न्यूज । मागच्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. जळगाव जिल्ह्यात एप्रिलमध्येच तापमान ४३ ते ४४ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचला असून त्यामुळे ‘मे हिट’चा अनुभव एप्रिलमध्येच येऊ लागला आहे. त्यातच वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक गडद झाली आहे.

जिल्ह्यात सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या हतनूर धरणात तर गतवर्षी 47.6 टक्के होता. मात्र यावर्षी हातनूर धरणात फक्त 44.78 टक्के जलसाठा शिल्लक आहे. म्हणजेच हतनूरमध्ये यंदा सुमारे तीन टक्के जलसाठ्यात घट झाल्याचे समोर आले आहे.
तसेच जिल्ह्यातील अंमळनेर, भडगाव, जामनेर व चाळीसगाव या तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. या चार तालुक्यांतील सात गावांमध्ये सुमारे आठ पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. पाणीटंचाईमुळे विहिरींच्या अधिग्रहणालाही गती देण्यात आली असून, एरंडोल तालुक्यात 1, मुक्ताईनगरमध्ये 4, पाचोरामध्ये 4, चाळीसगावमध्ये 4 आणि अंमळनेर तालुक्यात 8 अशा एकूण 31 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.