जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२५ । राज्यात मागच्या काही दिवसापासून वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक होरपळून निघाला असून अशातच हवामान खात्याने राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात पुढचे ४ ते ५ दिवस महत्वाचे असून ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष IMD कडून जळगाव जिल्ह्यात आजपासून आगामी तीन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे जळगावकरांना उष्णतेतून दिलासा मिळणार आहे.

या जिल्ह्यांना अलर्ट?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली येथे जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविली असून त्यापार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पालघर, ठाणे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत आहेत. उष्ण आणि दमट वाऱ्याच्या संगमातून कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पुढील ५ दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यात तीन दिवस येलो अलर्ट
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून उष्णतेच्या लाटेने हैराण जळगावकरांना आगामी काही दिवस उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात ९ मे पर्यंत पातसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, आगामी काही दिवस सायंकाळच्या वेळेस ३० ते ६० किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासाठी हवामान विभागाकडून जिल्ह्यात ७ मेपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे दुपारी ४ वाजेनंतर काही महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडण्याच्या आवाहनदेखील करण्यात आले आहे.