जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । पाचोरा न्यायालयाने पकड वारं बजावल्यानंतर अटक करुन घेऊन जात असलेल्या आरोपीला पोलिसाच्या ताब्यातून हिसकावून पळून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी चाळीसगाव पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्यात शुक्रवारी तदर्थ जिल्हा सत्र न्यायाधीशांनी आरोपीला ६ महिने सक्त मजुरी व दीड हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. भाऊसाहेब त्र्यंबक पाटील (रा. भामरे बु. ता. चाळीसगाव) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे.

२६ ऑक्टोबर २०१९ रोजी नियमित फौजदारी खटल्यास प्रथम न्यायदंडाधिकारी पाचाेरा यांनी भादंवी कलम १४८ मधील आरोपी दत्तात्रय नाना पाटील (रा. भामरे बु, ता. चाळीसगाव) यास पकड वारं जारी केले होते. त्यानुसार पोलिस कॉन्स्टेबल सुभाष भीमराव पाटील हे आरोपी दत्तात्रय याला अटक करुन चाळीसगाव पोलिस ठाण्यात घेऊन जात होते. पोलिस ठाण्यासमोर भाऊसाहेब पाटील आला. त्याने आरोपीला अटक करु नका, नाही तर तुम्हाला महागात पडेल, तुमच्याविरुध्द खोटे अर्ज करेल, बदनामी करेल अशी पोलिसाला धमकी दिली. तसेच त्यांच्या ताब्यातून दत्तात्रय याला हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. शांततेचा भंग करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. सुभाष पाटील यांच्या फिर्यादीवरुन त्याच्याविरुध्द चाळीसगाव पोलिस ठाण्यात २५ ऑक्टोबर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या खटल्यात तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. बोहरा यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. पाच साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. फिर्यादी व प्रत्यक्षदर्शीची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकारपक्षातर्फे भारती खडसे यांनी कामकाज पाहिले.
हे देखील वाचा :
- पालजवळच्या बोरघाटात मजुरांना घेऊन येणाऱ्या पिकअपचा अपघात; एक ठार २१ जखमी
- प्रेमाच्या जाळ्यात फसवून तरुणीच्या धर्मांतराचा प्रयत्न फसला ; जळगावात दोघांवर गुन्हा दाखल
- जळगाव शहरात भीषण अपघात : दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू
- मुक्ताईनगरजवळ ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात ; २ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
- सुरतच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून जळगावातील हॉटेलमध्ये नेलं अन्.. पुढे घडलं धक्कादायक