⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

अभिमानास्पद ! जळगावच्या सुपुत्राचा ‘काँक्रीट मॅन’ म्हणून गौरव !

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२३ । रोट्टरी क्लब ऑफ़ अंबरनाथ तर्फे आयोजित कार्यक्रमात हॉटेल कृष्णा पॅलेस येथे जळगावचे सुपुत्र असलेले अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष तथा रो.सुनील चौधरी यांचा “कॉन्क्रीट मॅन ऑफ द अंबरनाथ’ या पुरस्काराने सम्मान करण्यात आला. यावेळी रोटरी गवर्नर डॉ मयुरेश वारके , आमदार डॉ बालाजी किणीकर, आमदार किसन कथोरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, रो. अध्यक्ष आनंद राणे, रो ईश्वर चव्हाण यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

अंबरनाथ शहरामध्ये अंबरनाथ नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती हालाकीची असतांना आर्थिक नियोजन नसतांना सुनील चौधरी यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, खा. डॉ श्रीकांत शिंदे व आमदार डॉ बालाजी किणीकर तसेच सर्व नगरसेवक यांच्या सहकार्याने अंबरनाथ शहरात विकास करायची सुरुवात केली. सर्व रस्ते कॉन्क्रीट चे करण्याचा 200 कोटीचे टेंडर्स मंजूरी करुन निविदा देत असतांना आर्थिक नियोजन नसतांना मुख्याधिकारी आणि सर्व अधिकारी वर्ग सर्व इंजीनियर्स यांच्या सहकार्याने मार्गदर्शन घेऊन आर्थिक निधि उभा करणे, नागरिकांच्या सहाय्याने विविध संस्था मंडळाने सहभाग करुन ज्या ठिकाणी नुकसान होत ते बंद करुन मार्ग काढून पुढील नियोजन करुन संपूर्ण शहरात अंबरनाथमध्ये बिल्डर्स नागरिकांच्या माध्यमातून रस्ते बनविणे, लोक सहभागातुन रस्ते बनविणे, UT WT चे कमी खर्चाचे कॉन्क्रीट चे रस्ते बनविणे हा जो त्यांनी पॅटर्न तयार केला ते कौतुक, त्यानंतर मग विविध प्रकल्प खासदारांच्या माध्यमातून पुढे आले.

सुनील चौधरी कॉन्क्रीट मॅन तर खासदारशिंदे विज़न मॅन हे अंबरनाथ मध्ये सुप्रसिद्ध झाले. त्यांची वाहवाह अंबरनाथ करांनी केली. हा बहुमान गवर्नर आणि सर्व टीम उपस्थितांच्या साक्षीने त्यांना कॉन्क्रीट मॅन ही पदवी बहाल करण्यात आली. त्या वेळेला शहरातील सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित होते. 2010 ते 2015 या कालावधीत अंबरनाथचे नगराध्यक्ष म्हणून काम करतांना सुनिल चौधरी यांनी लोकसंपर्कावर अधिक भर दिल्याचे जाणवले. नगराध्यक्ष म्हूणन जनतेच्या अपेक्षांना सामोरे जाताना लोकांनी प्रश्न नव्हे तर उपाय सुचवावेत असे आवाहन त्यांनी केले होते. नगरपालिका कार्यालयातील नगराध्यक्ष दालन सदैव खुले ठेवून पालिकेत येणाऱ्या प्रत्येकाला भेटण्यासाठी सुनिल चौधरी सदैव तत्पर असत, असेच चित्र त्याच्या कालावधीत निदर्शनाला आले होते. नगराध्यक्षपदाचा अवधी अडीच वर्षाचा असला तरी 5 वर्षे नगराध्यक्ष पदावर राहण्याचा मान सुनिल चौधरी यांना मिळाला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडताना अंबरनाथच्या विकासात सुनिल चौधरी यांच्या कार्याचा उल्लेख केला ही अंबरनाथकराच्या दृष्टीने अभिमानाची घटना ठरली. नगराध्यक्ष म्हणून काम करतांना सुनिल चौधरी यांनी लोकांच्या अनेक अपेक्षांकडे सकारात्मक दुष्टकोनातून पाहिल्याचे दिसले. याचाच परिणाम म्हणून खड्डेमुक्त रस्ते ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शहरातील रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यावर त्यांनी पालिकेच्या माध्यमातून भर दिला आणि युती डबल युतीच्या माध्यमातून तत्कालीन काही प्रमुख रस्त्याचे सिमेंटीकरण केले होते. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरतांना नागरी सहभागातून आणि बांधकाम व्यावसायिकाना त्याच्या परिसरातील रस्ते बनवण्याचे आवाहन करून सिमेंटीकरणाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचे कार्य केले. त्यांच्या संकल्पनेतून तयार झालेले सिमेंटचे रस्ते खड्डे मुक्त असल्याने लोकांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाल्याचे दिसत होते.


शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रातही सुनील चौधरी यांनी विशेष लक्ष घालून शहरातील वापराविना पडून राहिलेल्या पालिकेच्या मालकीच्या अनेक जागांना नवस्वरूप देण्याचे काम केले. याच प्रयत्नातून अंबरनाथच्या पूर्वेकडील स्वामी समर्थ चौकातील शिवदर्शन बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या विनावापर जागेवर संगीत उद्यानाची निर्मिती सुनिल चौधरी यांनी केली. याच उद्यानाला लागून असलेल्या जागेत अंबरनाथ मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक वास्तू उभारून शहरातील ज्येष्ठ नागरिकांना एक कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून दिली. हुतात्मा चौकात असलेल्या पालिकेच्या विना वापर पडून असलेल्या व अनेकदा गैरवापर केला जात असलेल्या जागेवर मधु मंगेश कर्णिक साहित्य उद्यानाची निर्मिती करून हुतात्मा चौकाला नवी झळाळी देण्याची संकल्पना सुनील चौधरी यांनी प्रत्यक्षात आणली.

राजकीय वाटचाल करतांनाही सुनील चौधरी यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही आपले योगदान सुरू ठेवले होते. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून मराठी साहित्य संमेलन आयोजित करून अंबरनाथ करांची साहित्यिक भूक भागवण्याचे कामही केले होते. मराठी साहित्याच्या जागरात सुनील चौधरी यांनी घरो घरी पुस्तके ही संकल्पना राबवण्याचा मोलाचा प्रयत्न केला. त्यातही शहरातील विविध ठिकाणी विविध साहित्यिकांचे व विविध विषयांवरील पुस्तके वाचन प्रेमी साठी विनामूल्य उपलब्ध करून दिली. सुनिल चौधरी यांच्या या साहित्य जागर मोहिमेत अनेकांनी पुस्तके, ग्रंथ देऊन आपलेही योगदान दिले होते. सोशल मीडियाचा उपयुक्त वापर करण्याचे अनोखे कार्य सुनील चौधरी यांनी केले आणि अंबर भरारी ची स्थापना केली. त्या माध्यमातून शहरातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कर्तुत्वाचा ठसा उमटवणाऱ्या अनेकांची माहिती मिळू लागताच त्यांच्यासाठी अंबर भरारीच्या माध्यमातून खुले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्यही सुनील चौधरी यांनी करून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना जोडण्याचे काम असे करता येऊ शकतो याचे उदाहरण घालून दिले.