⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

अभिमानास्पद : खान्देश कन्या कवियीत्री बहिणाबाई चौधरी यांचे लवकरच येणार टपाल तिकीट

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२२ । अवघ्या जगाला आपल्या साध्या सरळ सोप्या भाषेत जिवनाचे तत्वज्ञान सांगणाऱ्या खान्देश कन्या कवियीत्री बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने लवकरच टपाल तिकीट प्रकाशित करावे. यासाठी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री ना. अश्विन वैष्णव यांची भेट घेतली.कवियीत्री बहिणाबाई चौधरी यांच्या जिवनावरील   माहिती सादर करीत खासदार उन्मेश दादा पाटील यांनी टपाल तिकिटाचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला. मंत्री महोदयांनी प्रस्तावाच्या अनुषंगाने टपाल तिकिट प्रकाशित करण्यास हिरवा कंदील दिल्याने गेल्या अनेक वर्षापासून बहुप्रतिक्षेत असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने पहिल्यांदाच टपाल तिकीट प्रकाशित होणार असल्याने बहीणाबाई चौधरी यांचे साहित्य सातासमुद्रापार पोहचणार आहे.

       देशाचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ना.अश्विनजी वैष्णव यांच्याकडे खान्देशकन्या ज्येष्ठ कवियित्री बहिणाबाई चौधरी यांच्यावर तातडीने टपाल तिकीट प्रकाशित करण्याबद्दल विनंती केली आपल्या निवेदनात खासदार उन्मेशदादा पाटील यांनी नमूद केले आहे  जळगाव येथून जवळच असलेल्या आसोदा येथे जन्मलेल्या खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी मराठी साहित्य विश्वात अशिक्षित असताना देखील आपल्या रसाळ, मधाळ आणि जीवनाचा सार सांगणाऱ्या कवितामुळे एक आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे. खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म जळगाव तालुक्यातील आसोदा येथे 24 ऑगस्ट 1880 रोजी झाला असून त्यांच्या कविता मराठी काव्यसृष्टीचा चमत्कार म्हणून युग कवियित्री निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांना ओळखले जाते. निरक्षर असल्या तरी कवितेतून प्रकट होणारे तत्वज्ञान मोठमोठ्या तत्वज्ञान्यांनाही लाजवणारे आहे. आपल्या पतीच्या निधनानंतर खंबीरपणे संसाराचा गाडा ओढतांना बहिणाबाई एक आदर्श स्त्रीचे प्रतीक होत्या व त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना एखादी अडाणी आणि निरक्षर स्त्री पूर्णपणे उध्वस्त झाली असती मात्र त्यांच्या कवितेतून संसारी स्त्रीची सुखदुःखे जगत असताना अंतः स्फूर्तिने बहिणाबाईंचे काव्य स्फुरले आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असताना एकत्र कुटुंब पद्धती, रीतीभाती, सण-उत्सव, स्त्रीजिवन, सासर-माहेर, जातीची उतरंड समकालीन वास्तवाचे भिन्न भिन्न रूपे बहिणाबाईंच्या कवितेतून साऱ्या विश्वाला प्रत्ययास आले असून कवितेतून येणारे संदर्भ जगाला विचार करायला लावणारे आहेत. त्यांच्या कवितेतून सोशिकपणाचे, खंबीरतेचे दर्शन घडत असून हा विचार समस्त महिलांना उभारी देणारा आहे.

                   आदर्श थोर कवयित्री बहिणाबाई यांचा जन्म माझ्या मतदारसंघातील आसोदा येथे झाल्याचा माझ्यासह समस्त खान्देशवासियाना सार्थ अभिमान आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे स्मारक देखील दुर्लक्ष आहे. याबाबत सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. मात्र राज्य शासनाची उदासीनतेमुळे आज पावेतो कामाला गती मिळाली नाही. आज या पत्राद्वारे आपणास विनंती करतो की खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने टपाल तिकीट प्रकाशित करावे जेणेकरून या निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या अहिराणी बोली भाषेतील कवितेचा हा अद्भुत चमत्कार जगभरात पोहोचण्यास मदत होणार आहे. तीन डिसेंबर हा त्यांचा स्मृतिदिन असून 3 डिसेंबर 1951 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला होता आपल्या कवितेतून मराठी साहित्यविश्वाला या अहिराणी भाषेतील कवितांनी भुरळ घालणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने केंद्र सरकारने तातडीने टपाल तिकीट जारी करावे व त्यांना आदरांजली द्यावी. अशी विनंती खासदार उन्मेश दादा पाटील यांनी ना. अश्विन वैष्णव यांचेकडे प्रत्यक्ष भेटून केली आहे.