जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२६ । धरणगाव तालुक्यातील पाळधी रेल्वे स्थानकावर रेल्वे लाईन क्लिअर नसल्यामुळे तब्बल तीन तास खोळंबलेल्या उधना-हसनपूर एक्सप्रेसमधील प्रवाशांसाठी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील देवदूत ठरले आहेत. कडाक्याच्या उन्हात पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या प्रवाशांची परिस्थिती पाहून त्यांनी तातडीने २५० पाण्याचे जार उपलब्ध करून देत माणुसकीचे दर्शन घडवले.

नेमकी घटना काय?
उधना ते हसनपूर ही प्रवासी रेल्वे गाडी तांत्रिक कारणास्तव सकाळी ११ वाजेपासून पाळधी स्थानकावर थांबवून ठेवण्यात आली होती. रेल्वे लाईन क्लिअर नसल्याने हा थांबा तब्बल तीन तास लांबला. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे आणि स्थानकावर मूलभूत सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

सध्या उन्हाचा कडाका वाढलेला असल्याने लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक पाण्यासाठी कासावीस झाले होते. रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण होते. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांचे चिरंजीव तथा जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता पाळधी स्थानक गाठले. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन तातडीने २५० पाण्याचे जार मागवले आणि अडकलेल्या रेल्वेतील प्रवाशांची तहान भागविली गेली आणि त्यांना मोठा दिलासा मिळाला.
प्रवाशांनी मानले आभार
अडचणीच्या काळात वेळेवर मिळालेल्या या मदतीमुळे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. लोकप्रतिनिधी असावा तर असा, अशा शब्दांत प्रवाशांनी प्रतापराव पाटील यांच्या संवेदनशीलतेचे कौतुक करत त्यांचे आभार मानले. या उपक्रमामुळे राजकीय वर्तुळातही त्यांच्या तत्परतेची चर्चा होत आहे.
“रेल्वेच्या तांत्रिक अडचणीमुळे प्रवाशांना होणारा त्रास पाहून ही मदत करणे आपले कर्तव्य होते. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांचे हाल पाहवत नव्हते, म्हणूनच तत्काळ पाण्याची व्यवस्था केली.”
— प्रतापराव पाटील (सदस्य, जिल्हा परिषद)











