⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

Breaking : राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेला परवानगी, शासनाने घातल्या १६ अटी

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२२ । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला अखेर परवानगी मिळाली आहे.ही परवानगी देत असताना राज ठाकरे यांना पोलीस प्रशासनाकडून १६ अटी घालण्यात आल्या आहेत. या अटीशर्थींमध्ये कुणावर वैयक्तिक टीका न करणे, तसंच धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी बाळगणे या महत्वाच्या अटींचा समावेश आहे. त्याचबरोबर राज यांच्या सभेसाठी अजून जवळपास 10 अटी टाकण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे. या अटींचे पालन करून १ मे या महाराष्ट्र दिनी राज ठाकरे यांना आता आपले विचार व्यक्त करता येणार आहेत. ही परवानगी मिळाल्यामुळे मनसेमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या अटी पाळाव्या लागणार:

१. राज ठाकरे यांनी ही जाहीर सभा १ मे २०२२ रोजी सध्याकाळी साडे चार वाजता या वेळेतच आयोजित करावी. कार्यक्रमाचे ठिकाण व वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करू नये.
२. सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला येताना व परत जाताना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी. असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी.
३. सभेसाठी बोलावलेल्या सर्व वाहनांना पोलिसांनी दिलेल्या मार्गाने प्रवास करण्याचा व मार्ग न बदलण्याच्या सूचना द्याव्या. त्या वाहनांनी शहरात व शहराबाहेर प्रवासादरम्यान त्या-त्या रस्त्यावर विहीत वेगमर्यादेचे पालन करावे. सभेला आलेल्या नागरिकांना त्यांची वाहने पार्किंगसाठी निर्धारि केलेल्या ठिकाणीच पार्किंग करण्याच्या सूचना द्याव्यात. सभेसाठी येताना अथवा परत जाताना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल, कार रॅली काढू नये. त्याच प्रमाणे राज ठाकरे यांना अधिकृत सुरक्षा पुरविण्यात आली असून आयोजकांनी त्यांच्या सभेच्या ठिकाणी येण्याच्या व सभेवरून जाण्याच्या वेळी कोणतीही रॅली काढू नये.
४. कार्यक्रमादरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगू नये किंवा त्यांचे प्रदर्शन करू नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदींचा भंग करू नये.
५. अट क्रमांक २, ३ व ४ बाबत सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना कळविण्याची जबाबदारी संयोजकांची राहील.
६. सभेच्या कार्यक्रमात स्वयंसेवक नेमण्यात यावेत. त्यांची नावे, मोबाईल क्रमांक, तसेच सभेसाठी औरंगाबाद शहराच्या बाहेरून निमंत्रित करण्यात आलेल्या नागरिकांच्या वाहनांची शहर/ गावांना अनुसरून संख्या, त्यांच्या येण्याचा व जाण्याचा मार्ग, येणाऱ्या लोकांची अंदाजे संख्या ही माहिती सभेच्या एक दिवस अगोदर पोलीस निरीक्षक, सिटीचौक यांच्याकडे देण्यात यावी.
७. सभा स्थानाची आसन व्यवस्था कमाल मर्यादा १५००० इतकी असल्यामुळे त्या ठिकाणी १५००० पेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करू नये. अशा प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकली, अव्यवस्था, गोंधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जबाबदार धरले जाईल.
८. सभास्थानी सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी निर्देशित केलेल्या ठिकाणी मजबूत बॅरिकेड्स उभारावेत, सभेसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य ती तपासणी करण्याचा अधिकार पोलिसांना असेल. यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी.
९. सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म इत्यादी किंवा ते पाळत असणाऱ्या प्रथा/ परंपरा या वरून कोणत्याही व्यक्ती व समुदायाचा अपमान होणार नाही अगर त्याविरुद्ध चिथावणी दिली जाणार नाही अशी कृती, वक्तव्ये, घोषणाबाजी कोणीही करणार नाही, याची आयोजक व वक्त्यांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी.
१०. सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपकाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश व ध्वनिप्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम २००० नुसार आवाजाच्या मर्यादेचे पालन करावे. ही अट न पाळल्यास ५ वर्षे इतक्या मुदतीचा तुरुंगवास आणि एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा होऊ शकते.
११. या कार्यक्रमादरम्यान कुठल्याही अत्यावश्यक सुविधा (शहर बस सेवा, अॅम्ब्युलन्स, दवाखाना, मेडीकल, विजपुरवठा, पाणीपुरवठा, दळव-वळण यांना बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.
१२. सभेच्या दिवशी वाहतूक नियमनासाठी या कार्यालयाकडून काढली जाणारी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३६ अन्वयेची अधिसूचना सर्व संयोजक, वक्ते व सभेला येणाऱ्या नागरीकांना बंधनकारक राहील.
१३. सभेसाठी येणाऱ्या महिला व पुरुषासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी व स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी.
१४. सभेसाठी वापरण्यात येणारी विद्युत यंत्रणा, बॅरिकेड्स, मंडप, ध्वनिक्षेपक सुस्थितीत असल्याची खात्री करावी व विद्युत यंत्रणेमध्ये काही बिघाड झाल्यास पर्यायी विद्युत यंत्रणेची (जनरेटरची) व्यवस्था अगोदरच करावी.
१५. या कार्यक्रमादरम्यान मिठाई व अन्नदान वाटप होत असल्यास अन्न व मिठाईतून कोणासही विषबाधा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
१६. हा कार्यक्रम सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आपणास घालून दिलेल्या उपरोक्त अटींचे व शर्तीचे उल्लंघन केल्यास कार्यक्रमाचे सर्व संयोजक व वक्ते यांच्यावर प्रचलित विधी, उपविधी व नियमानुसार कारवाई केली जाईल व अशा कारवाई दरम्यान ही नोटीस न्यायालयात पुरावा म्हणून वापरली जाईल याची नोंद घ्यावी.