⁠ 
शनिवार, मे 4, 2024

संकट : दिपनगर केंद्रात एकच दिवसाचा कोळसा साठा शिल्लक, ..तर एक संच होणार बंद

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२१ । कोळसाअभावी देशासह महाराष्ट्रावर वीज संकटाचा धोका निर्माण झाला आहे. भुसावळ येथील दीपनगर औष्णिक केंद्र येथे कोळशाचा साठा २९ हजार टनवरून २० हजार ४०१ टनांपर्यंत घसरला आहे. आहे परिस्थितीत देखील दीपनगर केंद्रातून राज्याला ६८० मेगावॅट विजेचा पुरवठा सुरू आहे. दरम्यान, एकच दिवसाचा कोळसा साठा शिल्लक असल्याने दैनंदिन पुरवठा रखडल्यास एक संच बंद होऊ शकतो.

गेल्या महिन्यात देशासह राज्यात मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. या मुसळधार पावसामुळे कोळशाचा पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे कोळशाअभावी वीज संकटाचा धोका निर्माण झाला आहे. सध्या सण-उत्सव सुरु आहे. अशात राज्यातील विजेची मागणी वाढल्याने दीपनगर केंद्रातून निर्मिती वाढवण्यासाठी ५०० मेगावॅटचे दोन्ही संच कार्यान्वित करण्यात आले. यामुळे कोळशाचा साठा २९ हजार टनवरून २० हजार ४०१ टनांपर्यंत घसरला आहे. मात्र, अशाही स्थितीत दीपनगर केंद्रातून राज्याला ६८० मेगावॅट विजेचा पुरवठा सुरू आहे. एकच दिवसाचा कोळसा साठा शिल्लक असल्याने दैनंदिन पुरवठा रखडल्यास एक संच बंद होऊ शकतो.

दीपनगरातील कोळसा साठा घसरल्याने ५०० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक ५ बंद केला होता. यानंतर महानिर्मिती प्रशासनाने कोळशाचा साठा वाढवला. परिणामी सोमवारी (दि. ४) २९ हजार टन कोळसा साठा झाल्याने हा संच पुन्हा सुरू करण्यात आला. यामुळे वापर वाढल्याने केंद्रात सध्या २० हजार ४०१ टन कोळसा शिल्लक आहे. शनिवारी दुपारपर्यंत केवळ एक रॅक कोळसा प्राप्त झाला. अशा बिकट स्थितीत दीपनगर केंद्रातून विजेची निर्मिती सुरू आहे.

मात्र, दोन दिवस चार ते पाचऐवजी एक किंवा दोनच रॅक कोळसा मिळाल्यास शिल्लक साठ्यातून कोळसा वापरला जाईल. यामुळे प्रशासनाला पुन्हा ५०० मेगावॅटच्या दोनपैकी एक संच बंद करावा लागू शकतो. दरम्यान, राज्यात ऑक्टोबर हीट व सण-उत्सवांमुळे विजेची मागणी वाढली आहे. शनिवारी दुपारी ही मागणी २० हजार ६३७ मेगावॅट होती. या तुलनेत निर्मिती केवळ १३ हजार ५०२ मेगावॅट होती.