⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना निशुल्क इस्रोला जाण्याची संधी

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ जुलै २०२१ । कोरोना काळात विद्यार्थी व पालकांसाठी सुखद बातमी आहे.शालेय स्तरावरील सर्वच परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थी व पालक नाउमेद होत आहेत, अश्या काळात  इसरोला जाण्यासाठी अभ्यासाची संधी जळगावच्या नोबेल फाउंडेशन ने उपलब्ध करून दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात अभ्यासाची संधी उपलब्ध झाली आहे.

विज्ञान व संशोधन क्षेत्राबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी नोबेल फाउंडेशन ही संस्था कार्यरत आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्था(इस्रो), आयआयटी, आयआयएम यासारख्या उच्च शिक्षण संस्था अनुभवता याव्यात तसेच विज्ञान व गणित या विषयाचा पाया पक्का व्हावा यासाठी नोबेल फाउंडेशन तर्फे “नोबेल सायन्स टॅलेंट सर्च” परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच याउपक्रमासाठी बारामती ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सायन्स इनोव्हेशन अँड ऍक्टिव्हिटी सेंटर चे सहकार्य लाभले आहे.

इंग्रजी व मराठी माध्यमाच्या सर्व बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी सदर परीक्षा 29 ऑगस्ट रोजी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.अर्ज करण्यासाठी https://nobel-foundation.web.app/  या संकेतस्थळावर नोंदणी कारायची आहे.अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 ऑगस्ट 2021 आहे. मागील वर्षी या परीक्षेद्वारे 57 विद्यार्थ्यांची इस्रो,आयआयटी सहलीसाठी निवड झालेली आहे.

या परीक्षेत गुणवत्ता यादी मध्ये येणाऱ्या प्रथम पन्नास विद्यार्थ्यांना निशुल्क इस्रो, आयआयटी आयआयएम, सायन्स सिटी येथे अभ्यास सहलीला नेण्यात येणार आहे.यासह ज्या शाळेतील सर्वात जास्त विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होतील त्या शाळांना डॉ एपीजे कलाम चषक ,वैज्ञानिक साहित्य व पुस्तके भेट दिली जाणार आहेत. तसेच गुणवत्ता यादीतील प्रथम तीनशे विद्यार्थ्यांना करिअरच्या संदर्भात उन्हाळी व हिवाळी शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.आणि   सदर परीक्षेसाठी  पाचवी ते सातवी ,आठवी ते दहावी आणि अकरावी, बारावी डिप्लोमा असे तीन गट करण्यात आले आहेत, तिन्ही गटांसाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका असून परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असणार आहे .

तिन्ही गटांसाठी परीक्षेचा अभ्यासक्रम शालेय स्तरावरील सामान्य विज्ञान ,गणित आणि तंत्रज्ञान विषयक चालू घडामोडी हा असणार आहे. परीक्षेचा अर्ज नोबेल फाऊंडेशनच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या उपक्रमाबाबत बोलताना नोबेल फाऊंडेशनचे संस्थापक जयदीप पाटील म्हणाले की ” ग्रामीण भागात प्रचंड क्षमता आहेत या विद्यार्थ्यांना शालेय वयापासून जर संशोधनाची गोडी लागली तर महाराष्ट्रातून नोबेल विजेते शास्त्रज्ञ घडतील यासाठी सामूहिक स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे म्हणून नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा आयोजित करीत आहोत जेणेकरून गोरगरिबांच्या मजुरांच्या मुलांनासुद्धा इस्रो सारख्या जागतिक दर्जाच्या संस्था अभ्यासायला मिळतील”

तरी अधिकाधिक शाळा , क्लासेस व विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक नोबेल फाउंडेशनचे संस्थापक जयदीप पाटील, राज्य समन्वयक संतोष पवार यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी नोबेल फाउंडेशन आय एम आर कॉलेज जवळ जळगाव 7218501444, 9307964077 या क्रमांकावर संपर्क साधावा.