जळगाव लाईव्ह न्यूज । देशभरात खळबळ माजवून सोडणाऱ्या ‘नीट २०२६’ (NEET 2026) पेपरफुटी प्रकरणानंतर राष्ट्रीय परीक्षा आयोगाने अखेर मोठा निर्णय घेतला आहे. ३ मे २०२६ रोजी झालेली परीक्षा रद्द करण्यात आली असून, आता २१ जून २०२६ रोजी देशभरात पुन्हा एकदा ही परीक्षा घेतली जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अधिकृतपणे ही नवीन तारीख जाहीर केली असून, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी काही दिवसांचा वेळ मिळाला आहे. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेला सामोरे जावे लागणार असून, पेपरफुटीच्या मनस्तापामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे.

३ मे रोजी झालेल्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे उघड झाल्यानंतर देशभरात तीव्र पडसाद उमटले आणि विद्यार्थ्यांची मोठी आंदोलने झाली. या वाढत्या दबावानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर काल रात्री केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत एक महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक पार पडली. तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत उच्च शिक्षण सचिव सचिन विनीत जोशी, शालेय शिक्षण सचिव संजय कुमार, अभिषेक सिंह, राहुल सिंग आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पेपरफुटीच्या चौकशीचा आढावा घेण्यात आला आणि अखेर आज परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली.

या प्रकरणाचा तपास थेट सीबीआयकडे सोपवण्यात आला असून, त्यांच्या प्राथमिक तपासानंतरच परीक्षा प्रणाली थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. सीबीआयच्या तपासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच काही जणांच्या मोबाईल फोनवर नीटचा पेपर पोहोचला होता. प्राथमिक माहितीनुसार, हा पेपर थेट नाशिकहून राजस्थानला पोहोचला आणि राजस्थानमधून तो हरियाणाला पाठवण्यात आला. या प्रकरणात महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर (अहमदनगर) येथून काहींना अटक करण्यात आली असून, यामध्ये लातूरचेही कनेक्शन समोर आले आहे. यावरून पेपरफुटीचे हे एक मोठे आंतरराज्यीय जाळे असल्याचे स्पष्ट होत आहे.











