⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

महाराष्ट्र परिक्रमा करायला जळगावातून सायकलवर निघाले एनसीसीचे छात्र सैनिक

महापौरांनी दाखवली हिरवी झेंडी, २२०० किलोमीटरचा असणार प्रवास

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२२ । राष्ट्रीय छात्र सेनाचे स्थापना आणि आझादी का अमृत महोत्सवाच्या ७५ गौरवशाली वर्षाच्या स्मरणार्थ, १८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअन जळगाव येथे ग्रुप मुख्यालय, अमरावती यांच्या नेतृत्वाखाली महापरिक्रमा नावाची मेगा सायकलिंग मोहीम राबविण्यात येत आहे. समाजात जनजागृती करण्याच्या उद्देशाने १० छात्र सैनिकांचा समावेश असलेल्या सायकल परिक्रमेचा गुरुवारी सकाळी महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला. परिक्रमेत राज्यात २२०० किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे.

राष्ट्र तसेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या उभारणीत तरुणांचे योगदान सर्वोत्तम आहे. या तारुण्यात चारित्र्य, साहस, नेतृवास आकार देण्यासाठी आणि शारीरिक सहनशक्ती विकसित करण्यासाठी महाराष्ट्र एन.सी.सी डायरेक्टरेटच्या विशेष प्रोत्साहनाने देशातील तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सायकलिंग मोहीम आयोजित करण्यात आलीली आहे. यात छात्र सैनिक सुमारे २२०० किलोमीटरचे अंतर पार करतील. यात विशेष म्हणजे देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी धोका असलेली बाब, चुकीची माहिती समाजात पसरवण्यापासून रोखण्यासाठी (Against Disinformation) छात्रसैनिक या मोहिमेत प्रत्येक शहरात, महाविद्यालयात, शाळांमध्ये या विषयावर पथनाट्य सदर करून जनजागृती देखील करणार आहेत. छात्र सैनिकांची ही परिक्रमा साहसाबरोबर राष्ट्रीय सुरक्षेची भावना समाजास प्रेरणा देणारी ठरणार आहे.”

महापरीक्रमेत अमरावती ग्रुपचे प्रमुख ब्रि. शंतनू मयंकर या मोहिमेचे संपूर्ण नियंत्रक म्हणून असणार आहेत. ११ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअनचे समादेशक अधिकारी कर्नल सी.पी.भाडोला या मोहिमेचे अधिकृत नेतृत्व करतील तर १८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअन, जळगाव चे लेफ्ट. कर्नल पवन कुमार, प्रशासकीय अधिकारी हे देखील मोहिमेत विशेष आयोजक म्हणून योगदान देत आहेत. राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र सैनिक (सिनिअर डिव्हीजन) आज जळगाव येथून परिक्रमेला सुरुवात करतील. यात अमरावती, नागपूर, नांदेड, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, पुणे आणि शेवटी पुणे असा हा प्रवास असणार असून महाराष्ट्रातील एन.सी.सी च्या सर्व विभागीय कार्यालयांना भेट देऊन महाराष्ट्रभर सायाकालीद्वारे जनजागृती केली जाणार आहे.

मोहिमेत मूळजी जेठा महाविद्यालयाचे ४, एन.एम. कॉलेज चे ३, बाहेती कॉलेजे चे २ तर अकोला येथील १ छात्र सैनिक सहभागी होणार आहेत. तर या मोहिमेत एन.सी.सी अधिकारी कॅप्टन (डॉ.) योगेश बोरसे, लेफ्ट. गौतम भालेराव, लेफ्ट. शिवराज पाटील यात योगदान देणार आहेत. तसेच बटालिअनचे बी.एच.एम. तात्या काकलीज हे सोबत असणार आहेत. मोहिमेसाठी १८ महाराष्ट्र बटालिअनचे बॅक अप वाहन कॅंटर सोबत असणार आहे.