जळगाव लाईव्ह न्यूज । सुनील महाजन । नशिराबाद मध्ये सर्वत्र अस्वच्छता, तुंबलेल्या गटार, सांडपाणी गल्लीबोळातून वाहतेय, ठिकठिकाणी साचलेले कचर्याचे ढीग, असे चित्र गावात दिसून येत असून, या अस्वच्छतेमुळे नशिराबादकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

जिल्ह्यात सर्वांत मोठे गाव म्हणून ओळखले जाणारे नशिराबाद येथे स:द्यस्थिती विविध साथरोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सोबतच अस्वछता आणि वातावरणातील बदलामुळे सर्दी-खोकला, तापासह विविध साथरोगांचे रुग्ण आढळून येत आहेत. गावातील रुग्ण जळगावमध्ये जाऊन उपचार घेत आहेत. गावाजवळून गेलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे तुंबलेल्या गटारांची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. अनेकदा याबाबत ओरड करूनही त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. कोणी दखल घेणार का? असे ग्रामस्थांकडून विचारणा केली जात आहे. तसेच साथरोग फैलावल्यानंतरच प्रशासनाला जाग येईल का ? असा प्रश्न उपस्थित करीत ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.तसेच गावातील रस्ते काँक्रिटचे असून, आता ते पूर्णपणे उखडले आहेत. गटारांतील सांडपाण्याने रस्त्यांची वाट लागली आहे. गावातील या समस्यांकडे लक्ष देऊन त्या सोडविण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

नागरिकांची प्रतिक्रिया
गाव जिल्ह्यात मोठ्या लोकसंख्येचे असून, पूर्वी ग्रामपंचायत होती. आता नगरपरिषदेत रूपांतर झाले आहे. गावात समस्यांनी डोके वर काढले आहे. गटारांतील सांडपाणी रस्त्यावरून वाहते आहे. त्यामुळे डास, मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असून, साथरोग फैलावण्याची शक्यता आहे. या समस्यांकडे लक्ष देऊन सोडविण्याची गरज आहे. – सुनील महाजन, कार्यकर्ता, शिवसेना, नशिराबाद
सध्या सर्वत्र करोनाचा संसर्ग वाढत आहे. गावातही ठिकठिकाणी कचर्याचे ढीग साचले आहेत. सांडपाणी रस्त्यावरून वाहते. सांडपाणी निचरा होण्यासाठी उपाययोजना व्हाव्यात. – राहुल रंधे, सामाजिक कार्यकर्ते, नशिराबाद
गावातील रस्त्यांची दैना झाली आहे. रस्ते सिमेंट काँक्रिटचे आहेत. सध्या ते उखडून खड्डे झाले आहेत. त्यात सांडपाणी साचून वाहन गेल्यास पादचार्यांच्या अंगावर उडून वाद होतात. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. – अशोक पवार, सामाजिक कार्यकर्ते, नशिराबाद
हे देखील वाचा :
- जळगाव जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत पावसाचा ‘येलो अलर्ट’; हवामान खात्याचा इशारा
- रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ
- जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांवर पोलिसांची मोठी कारवाई; ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त, २१ जणांवर गुन्हे दाखल
- कर्जमाफी योजनेतून जळगाव जिल्ह्यातील तब्बल ‘इतके’ हजार शेतकरी अपात्र?
- प्रवाशांना दिलासा ! जळगाव-भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ









