⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

शेतकऱ्यांसाठी खुशखबर : ४८ तासांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२२ । राज्यासाठी मान्सूनसंदर्भात खुशखबर आहे. सगळेचजण प्रतिक्षेत असलेला मान्सून दोन दिवसात महाराष्ट्रामध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज (IMD) हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना ज्याची प्रतिक्षा होती तो अखेर दोन दिवसांमध्ये दाखल होऊन खरिपाच्या पेरण्या वेळेत होती असा आशावाद आहे. Monsoon Update news in Maharashtra

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढच्या ४८ तासांमध्ये मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, गोवा, दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटकचा आणखी काही भागात मान्सून पुढे सरकरण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे पुढच्या दोन दिवसांमध्ये राज्यात मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

मान्सून अरबी समुद्रातच रेंगाळला असल्यामुळे राज्यात पावसाचे आगमन उशिरा होत आहे. पण अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस झाला. पण तोही हवा तसा झाला नाही. आज हवामान खात्याकडून राज्यातील २७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

शेती कामे उरकून शेतकरी पेरणीयोग्य पावसाच्या प्रतिक्षेत आहे. आता दोन दिवसांनी पावसाने हजेरी लावली तर सर्वकाही वेळेत होणार आहे. खरीप हंगामात वेळेत पेरण्या झाल्या की उत्पादन वाढीसही त्याचा उपयोग होतो.