जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२१ । पाचोरा तालुक्यातील अवकाळी पावसामुळे जवळपास ५१ हजार शेतकऱ्यांना फटका बसला असुन, हे अनुदान दिवाळीच्या आत मार्गी लागतील. असे पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आश्वासन दिले आहे. तसेच शहर व ग्रामीण भागातील घरातील नुकसानीचे पंचनामे केले जातील. या पाचोरा काँग्रेसच्या मागणीला मंत्र्याने हिरवा कंदील दिला आहे.
सविस्तर असे की, बुरहानपुर येथील प्रचार सभेसाठी विशेष विमानाने आपती व्यवस्थापन व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार हे जळगावला आले असता पाचोरा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अधिवक्ता अमजद पठाण, अल्पसंख्याक जिल्हा सचिव इरफान मनियार, ओ.बी.सी. सेल चे समाधान ठाकरे यांनी ना. विजय वडेट्टीवार यांना निवेदन देवुन चर्चा केली.
दरम्यान पाचोरा तालुक्यातील अवकाळी पावसामुळे जवळपास सर्वच शेतकर्यांचे नुकसान झाले. यात फळझाडे देखील आहेत मात्र, शासन दरबारी निंबु, मोसंबी यांचे नुकसान झाले असतांना पंचनामे केले नाहीत ते करण्यात यावे. तसेत पाचोरा शहरातील अनेक घरांमध्ये व दुकाने, गॅरेज, शोरूम मध्ये पाणी घुसून फार मोठे नुकसान झाले तरी देखील पंचनामे केली नाहीत. ते पंचनामे त्वरित करावे. शासनाने कृषी आणि महसुल यांनी एकत्र येऊन जवळपास ५४ हजार ८०६ हेक्टर बाधीत क्षेत्राचे ५१ हजार १९४ शेतकर्यांचे पंचनामा करुन अंतिम अहवाल शासनाकडे दिला आहे. त्याचे अनुदान दिवाळी पुर्वी द्यावे अशी निवेदनात मागणी करण्यात आली आहे. हे प्रश्न तात्काळ मार्गी लागतील असे आश्वासन ना. विजय वडेट्टीवार यांनी दिले.
यावेळी आ. शिरीष चौधरी, नुतन जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार, माजी खा. उल्हास पाटील, जळगाव शहर अध्यक्ष शाम तायडे, सेवादल जिल्हाध्यक्ष संजय पाटील, जळगाव तालुका अध्यक्ष मनोज चौधरी, ज्ञानेश्वर कोळी, भडगाव शहर अध्यक्ष दिलीप शेंडे, भुषण पवार, आशुतोष पवार आदी उपस्थित होते.