⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

महापौर, आयुक्तांसह दोन माजी महापौरांनी महामार्गावर खड्ड्यांची टेपने केली मोजणी

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । शहरातील समस्या निवारणासाठी सर्वच पातळ्यांवर आलेली मरगळ झटकून प्रशासनाला जाब विचारण्यासाठी महापौर जयश्री महाजन(JAYASHRI MAHAJAN), मनपा आयुक्त विद्या गायकवाड (VIDYA GAYAKVAD), माजी महापौर भारती सोनवणे(BHARATI SONAWNE), सिमा भोळे (SIMA BHOLE) या एकत्र आल्या. शहरातील महामार्गावरील खड्डे, रेल्वे उड्डाणपुलाच्या खालील अर्धवट रस्ते या विषयावर डायमंड गृपतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे (DR.PRAVIN MUNDE) यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर मान्यवर महिलांनी शिवकॉलनीजवळ महामार्गावर तयार झालेल्या महाकाय खड्ड्याची पाहणी करून त्याची मोजणी केली.

शिवकॉलनीजवळच्या खड्ड्याची खोली अडीच फूट आणि डांबराचा डिव्हायडरवर चढलेला थर पाहून महापौर महाजन व आयुक्त गायकवाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तेथूनच एनएचआयचे प्रकल्प प्रमुख चंद्रकांत सिन्हा यांना चर्चेसाठी या म्हणून सुनावले. आजच्या या अनोख्या पाहणी व निवेदन देण्यात डायमंड गृपच्या अडमीन सरीता माळी कोल्हे, यामिनी कुळकर्णी, राजेश नाईक, सुनील महाजन, अमीत जगताप, चंद्रकांत जैन, प्रशांत देशपांडे, दिलीप तिवारी, कल्पेश सोनवणे, पियुष व आयुष मणियार आदी उपस्थित होते.

जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा –
१) जिल्हा पोलीस सेवेतील निरीक्षक दर्जाचे अधिकारी बकाले यांनी मराठा समाजाविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध आम्ही जळगावकर करतो. पोलीस विभागात असे कृत्य इतर कोणीही करू नये म्हणून उचित शिस्तभंग कार्यवाही वेळीच व्हावी.
२) जळगाव शहरातील महामार्गाचे काम पूर्ण झाले. त्याचे लोकार्पण केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केल्यानंतर अद्याप ६ महिने पूर्ण झालेले नाहीत. मात्र पावसाच्या साडे तीन महिन्यात या रस्त्यावर प्रचंड खड्डे तयार झाले. रस्त्यावरील डांबरीथर व खडी उखडून थेट डिव्हायडरवर गेली आहे. या निकृष्ट कामाचे समर्थन एनएचआयचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा करीत आहेत. शिवकॉलनीजवळ महामार्गावर सर्वात मोठा खड्डा तयार झालेला असून तेथून १०० मीटरवर एनएचआयचे कार्यालय आहे. महामार्गावररील खड्डे कधी बंद करणार व रस्त्याचे काम एवढे निकृष्ट कसे ? याचे उत्तर एनएजआयने द्यावे.
३) शहरातील रेल्वे उड्डान पुलाच्या लगत जिल्हा परिषद आणि शिवाजीनगर या दोन्ही बाजूकडील जुन्या रस्त्यांचे काम अपूर्ण आहे.तेथे पावसामुळे भरपूर चिखल आहे. पथदीप नसल्याने अंधार असतो. तेथे समाजकंटक वा गावगुंड. महिलावा मुलामुलींची छेड काढू शकतात. नागरी सुरक्षेसाठी तेथे पथदिदीप लावण्याची सूचना पोलीस विभागाने पालिकेस देणे आवश्यक आहे.

सोमवारी महामार्गावर निदर्शने

शहरातील महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. शिवाय पथव्यांसाठी डिव्हायडरची मोडतोड केल्याने आणखी दूरवस्था झाली आहे. याबाबत एनएचआयच्या विरोधात सोमवारी जनरल अरूणकुमार वैद्य चौकात दिवसभर निदर्शने करण्याचा इशारा महापौरांसह इतरांनी दिला. या आंदोलनात जळगावकर सहभागी होतील.

सिन्हा यांना सायंकाळी बोलावले

शिवकॉलनीजवळ महामार्गावर तयार झालेल्या धोकादायक मोठ्या खड्ड्याची पाहणी महापौर, आयुक्त व माजी महापौरांनी केली. तेथूनच महापौरांनी एनएचआयचे सिन्हा यांच्याशी संपर्क करून दुपारी चर्चेसाठी बोलावले. यावेळी आयुक्त गायकवाड यांनीही योग्य ती कार्यवाही करू असे सांगितले.