बुधवार, सप्टेंबर 27, 2023

मनोज जरांगे यांनी सरकारचा नवा जीआरही धुडकावला ; नेमकं काय घडलं..

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२३ । मराठा आरक्षणासाठी गेल्या बारा दिवसांपासून उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचा नवा जीआरही धुडकावला. मनोज जरांगे यांनी भूमिका मांडत महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी-मराठा प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतलं जाणार नाही. हे आमरण उपोषण सुरु राहील, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं

जालन्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचं गेल्या 12 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. काल जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर शिवसेना नेते अर्जुन खोतकर सरकारचा एक लिफाफा घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी पोहोचले. तो लिफाफा अर्जुन खोतकर यांनीदेखील उघडला नव्हती. त्यामुळे मनोज जरांगे आज उपोषण मागे घेणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला होता.

अर्जुन खोतकर यांनी सरकारचा लिफाफा मनोज जरांगे यांच्याकडे सोपवला. त्यानंतर जरांगे यांनी लिफाफा उघडून पत्र वाचलं. मनोज जरांग यांनी ते पत्र वाचलं. त्यानंतर खोतकर आणि जरांगे यांच्यात काही काळ चर्चा झाली. जरांगे यांनी यावेळी आपल्या शिष्टमंडळासोबतही महत्त्वाची चर्चा केली. त्यानंतर भूमिका जाहीर केली. यावेळी अर्जुन खोतकर यांनी आधी भूमिका मांडली.

मनोज जरांगे यांनी भूमिका मांडत महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी-मराठा प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतलं जाणार नाही. हे आमरण उपोषण सुरु राहील, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. सरकारच्या जीआरमध्ये किरकोळ दुरुस्ती राहिली आहे, अर्जुन खोतकर उद्या दुरुस्ती करुन पुन्हा येतील, असा विश्वास जरांगे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.