शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! आज महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा, जळगावात..
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ डिसेंबर २०२४ । ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे जळगावसह महाराष्ट्रात ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली आहे. मागील दोन दिवसापासून राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. ऐन हिवाळ्यात पाऊस होत असल्याने रब्बी हंगामातील पिकांना फटका बसत असल्याचं पाहायला मिळत असून यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. दरम्यान, आज शुक्रवारी हवामान खात्याने १० जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
महाराष्ट्रात आज अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रविवारपर्यंत महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय.
जळगावात कसं असेल हवामान?
जळगावात आजपासून पुढील तीन दिवस अंशतः ढगाळ असणार आहे. यामुळे कमाल, किमान तापमानात चांगलीच वाढ झालेली दिसेल. मात्र, ९ डिसेंबरपासून थंडीचा जोर वाढणार आहे. या तारखेपासून किमान तापमान १२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता हवामान अभ्यासकांकडून वर्तवण्यात आली आहे.
गुरुवारी शहरात कमाल तापमान ३३ तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. आगामी तीन दिवस किमान तापमान १४ ते १६ तर कमाल तापमान ३२ ते ३४ दरम्यान असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ९ डिसेंबरपासून थंडी जोर धरायला सुरुवात करेल. यानंतर कडाक्याची थंडी पडणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक यांनी दिली. दरम्यान, गुरुवारी शहरात सायंकाळी चार ते सहा वाजेच्या दरम्यान आकाशात ढग गोळा झाले आहे. आकाशही अंधारून आले होते. मात्र, सहा वाजेनंतर पुन्हा आकाश निरभ्र झाल्याचे चित्र प्रकर्षाने समोर आले होते.