⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

मार्चमध्ये होणार महाराष्ट्र निर्बंधमुक्त! कोणते निर्बंध होणार शिथिल, जाणून घ्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२२ । घटती रुग्णसंख्या आणि कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याने मार्च महिन्यात महाराष्ट्र निर्बंधमुक्त होण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. मात्र मास्क लावणे अनिवार्य आणि फिजिकल डिस्टन्सिंग कायम राहणार आहे, असे ते म्हणाले.

गेल्या महिन्यात देशासह महाराष्ट्रात कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढली होती. त्यामुळे पुन्हा नवे निर्बंध लावण्यात आले होते. दरम्यान, सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागल्याने निर्बंध कमी करण्याच्या सूचना केंद्र सरकारनेही सर्वच राज्यांना दिले होते. पॉझिटिव्हिटी रेट आणि रुग्णसंख्या पाहून निर्बंध हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले, कोरोना कृती दलही निर्बंध हटवण्याबाबत अनुकूल आहे, परंतु निर्बंध पूर्णपणे हटवण्याबाबत मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील, असे टोपे यांनी स्पष्ट केेले. राज्यातील लसीकरण राहिलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. लसीकरण केल्यास चौथ्या लाटेचा धोका नाही, असे टोपे म्हणाले.

दरम्यान, निर्बंध मुक्त होत असले तरी मात्र मास्क लावणे अनिवार्य आणि फिजिकल डिस्टन्सिंग कायम राहणार आहे, असे ते म्हणाले. महामारीच्या काळात आपण अशी निर्बंध त्वरित थांबवू शकत नाही. परंतु निर्बंध कमी करण्याचा अंतिम निर्णय राज्य मंत्रिमंडळ घेईल’, असे टोपे म्हणाले

कोणते निर्बंध होणार शिथिल
चित्रपटगृहे, मॉल्स आणि इतर ठिकाणी ५० टक्के क्षमतेची मर्यादा शिथिल होण्याची शक्यता. राज्यातील हाॅटेल्स, उपाहारगृहे, ब्यूटी सलून व केशकर्तनालय १०० टक्के क्षमतेने चालवण्यास परवानगी मिळण्याची शक्यता. उद्याने, जलतरण तलाव, वॉटर पार्क पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता. लोकल, रेल्वे, बस प्रवासासाठी लसीच्या दोन डोसची सक्ती हटवण्याची शक्यता.

हे देखील वाचा :