जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२५ । महावितरणच्या वीज दर निश्चिती प्रस्तावावर देण्यात आलेल्या दर कपातीच्या आदेशाला महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानेच स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता नवा आदेश येईपर्यंत महावितरणच्या ग्राहकांना जुन्याच दराने वीज बिल भरावे लागणार आहे.

महावितरणने २०२५-२६ ते २०२९-३० या कालावधीसाठी दर निश्चिती याचिका दाखल केली होती. वीज नियामक आयोगाने त्यावर निर्णय घेत २८ मार्च रोजी वीज बिलात ७ ते १० टक्के कपात करण्याचा निर्णय दिला होता. १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणीही होणार होती. मात्र पण महावितरण दरवाढीच्या हट्टावर कायम राहिली. कंपनीने फेरविचार करण्यासाठी अर्ज दाखल केला. आयोगाचे आदेश सुस्पष्ट नाही, त्यामुळे ग्राहकांचे नुकसान होईल, असे कारणही दिले. त्यामुळे आयोगाने तत्काळ आपल्याच आदेशाला स्थगिती देत पुढील निर्णय होईपर्यंत पूर्वीच्याच दराने वीज बिल आकारणी करण्याचे बजावले. त्यामुळे वीज बिल कपातीचा निर्णय ग्राहकांसाठी ‘एप्रिल फूल’च ठरला.
हा निर्णय लागू झाला असता तर १ ते १०० युनिटपर्यंतच्या वीज वापरासाठी ४.७१ रुपये ऐवजी ४.४३ रुपये दर लावला जाणार होता. म्हणजे प्रतियुनिट २८ पैशांची बचत होणार होती. तर १०१ ते ३०० युनिटपर्यंतच्या स्लॅबमध्येही प्रतियुनिट १०.२९ रुपयेऐवजी ९.६४ रुपये दर आकारला जाणार होता. म्हणजे प्रतियुनिट ६५ पैशांची बचत होणार होती.