जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२२ । आज महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) सादर केला जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साहायाने अर्थसंकल्प सादर करीत आहे. या अर्थसंकल्पामधून राज्य सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये देण्याची घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे. तसेच तुळापूर येथे संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी २५० कोटीची तरतूद सरकारने केली आहे. आजच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यात आले.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा करताना अजित पवार म्हणाले की, नियमितपणे कर्जफेक करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा २०२० मध्ये करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या संकटामुळे त्याची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. मात्र आता २०२२-२३ च्या आर्थिक वर्षांत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.











