⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्बंधांचे संकेत

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२१ । महाराष्ट्रात कोरोनाचे एकीकडे रुग्ण वाढत आहे तर दुसरीकडे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागेल का अशी शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच निर्बंध कडक केलेले असताना उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी त्यावर आणखी एक प्रतिक्रिया दिली असून जानेवारीच्या अखेरीस निर्बंध आणखी कठोर होण्याची शक्यता आहे.

कोरोनाचे रुग्ण वाढण्याचा वेग वाढत असून मंगळवारी राज्यात 2 हजार 172 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. ही आकडेवारी महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे. राज्यात गेल्या कित्येक महिन्यातली ही सर्वात मोठी रुग्णवाढ आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दररोज ओमायक्रॉनचेही रुग्ण वाढत असून यावर आरोग्य यंत्रणा नजर ठेवून आहे. तिसरी लाट म्हणून सरकार याकडे पाहत आहे. तज्ज्ञांचं मत आहे की, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात परिस्थिती वेगळी असेल. त्यामुळे गरज पडली तर निर्बंध कडक केले जातील’, असे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

कोविड टास्क फोर्स या पार्श्वभूमीवर सक्रिय झाला आहे. टास्क फोर्सकडून जंबो हॉस्पिटलमध्ये मॉक ड्रिल सुरू आहेत. कोविड टास्क फोर्स सिरीज पंप, मल्टी-पॅरा मॉनिटर्स, व्हेंटिलेटर यांच्यासह पाइपलाईन चाचणी तसंच पॅथॉलॉजीच्या चाचणीसाठी ड्रिल करत आहे. कोविड टास्क फोर्सचे पथक सध्या ड्रिल करत आहेत जी स्पष्टपणे संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी असल्याचं बोललं जातंय. जेणेकरून परिस्थिती आणखी बिघडली तर तशी उपाययोजना राबवणं सोईस्कर होईल. दरम्यान काही जिल्ह्यांत जमावबंदीचे आदेशही लागू केले आहेत.

हे देखील वाचा :