⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

शेतकऱ्यांना मिळाल्या जमिनी परत : शेतकरी भावुक

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२२ । धाडी घातलेल्या आठ सावकारांच्या घरातून जप्त केलेल्या दस्ताच्या माध्यमातून १५ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनी परत करण्यात यश आले आहे. जमिनी परत मिळताच या शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले.

सावदा येथील नंदकुमार मुकुंदा पाटील याने सात जणांच्या मदतीने १०० एकर जमीन लाटली होती. १९९६ ते २००९ या कालावधीत रोखीने व्यवहार करीत या जमिनींवर या टोळक्याने कब्जा मिळविला होता. सावकारांच्या कब्जातून १०० एकर जमीन पीडितांना परत केल्याची ही राज्यातील पहिलीच कारवाई आहे.

नंदकुमार मुकुंदा पाटील, मुरलीधर सुदाम राणे, मुरलीधर तोताराम भोळे, मधुकर तुकाराम राणे, मुरलीधर काशीनाथ राणे, सुदाम तुकाराम राणे, श्रीधर गोपाळ पाटील, मधुकर वामन चौधरी, अशी या सावकारांची नावे आहेत. त्यांनी १५ शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्या होत्या. या जमिनी अवैध सावकारीतून बळकावल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते. जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई यांनी संबंधित शेतकऱ्यांनी या जमिनींचा ताबा घ्यावा, अशा आशयाचे आदेशपत्र प्रदान केले.