⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

व्यापारी संकुल प्रकरणी गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२१ । जामनेर येथील व्यापारी संकुलाच्या बांधकामात २०० कोटींचा अपहार झाल्याचा आरोप करत ऍड. विजय पाटील यांनी यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे तक्रार केली होती. दरम्यान, या तक्रारीची राज्य शासनाने तत्काळ दखल घेत या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेली समिती आज जळगाव येथील जिल्हा परिषदेत दाखल झाली.

समितीच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेत ठाण मांडले असून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून त्या संकुलाच्या बांधकामाची माहिती घेतली जात आहे. राज्यातील अशाप्रकारे घोटाळ्याचे हे पहिलेच प्रकरण असल्याचा दावा समितीकडून केला जात आहे. 

जामनेर येथील जिल्हा परिषदेच्या जागेवर खटोड बंधू भागीदार असणार्‍या कंपनीला व्यापारी संकुल बांधण्याची परवानगी देऊन २०० कोटी रूपयांचा घोटाळा झालेला असून यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री आ. गिरीश महाजन हे लाभार्थी असल्याचा गंभीर आरोप तक्रारदार अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी केला आहे. हा सर्व प्रकार घडल्यानंतर देखील जिल्हा परिषद प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याची तक्रार अड. विजय  पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे ३० मार्च रोजी केली होती. या तक्रारीची राज्य शासनाने तत्काळ दखल घेत तीन सदस्यांची समिती गठीत करून समितीला दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

या समितीत नाशिक विभागीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मनिष सांगळे, राजन पाटील, आणि सहाय्यक लेखाअधिकारी चंद्रकांत वानखेडे यांचा समावेश आहे.