⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

Heat Wave : जळगावचा पारा देशात तिसऱ्या क्रमांकाने सर्वाधिक, वाऱ्याचा वेग वाढला

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२२ । यंदा उन्हाळ्याची भयंकर तीव्रता जाणवत असून रखरखत्या उन्हामुळं नागरिक हवालदिल झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेची तीव्रता प्रचंड वाढली असून काल गुरुवारी जळगावचा पारा देशात तिसऱ्या क्रमांकाने सर्वाधिक ४५.६ अंशांवर पोहोचला होता. प्रचंड उष्णतेमुळे जळगावातील नागरिकांना कामासाठी घराबाहेर पडताना अक्षरश: कसरत करावी लागत होती. दरम्यान. वाढत्या उन्हामुळे उष्माघात हाेण्याचा धाेका असून दुपारी १२ ते ४ या काळात बाहेर पडणे टाळावे अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या.

संपूर्ण राज्यातील ७० टक्के जिल्ह्यांमध्ये तापमान ४२ अंशांपुढे गेले आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट अधिक तीव्र झालेली आहेत. जळगावात पारा सलग ४३ ते ४४ अंशांवर स्थिर आहे. अशातच गुरुवारी तापमानात वाढ हाेऊन पारा ४५ अंशांवर पाेहाेचला आहे. उष्ण वाऱ्याचा वेग ताशी १५ ते १७ किमीपर्यंत वाढल्याने या वाऱ्याचा परिणाम जनजीवनावर झालेला असल्याचे समाेर येते आहे.

यंदा १६ मार्चपासून जिल्ह्याच्या कमाल तापमानाने चाळिशी ओलांडली. यानंतर ६ रोजी जिल्ह्यात ४४ अंश एवढे सर्वोच्च तापमान नोंदवले गेले. या दिवशी किमान तापमान २५ अंश होते. यानंतर गेल्या काही दिवसापूर्वी अंशतः ढगाळ वातावरणामुळे पारा काहीसा घसरून ४० अंशावर आला होता. मात्र त्यानंतर पुन्हा तापमानाचा पारा वाढून ४५ अंशावर गेला आहे.

तापमानाचा पारा वाढला असल्याने सकाळपासूनच उन्हाचे चटके बसत आहे. सकाळी १० वाजेपासूनच उन्हाचा पारा ४० अशांवर जात आहे. तर आज शुक्रवारी १२ नंतर पार ४२ अशांवर जाणार आहे.

जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?

वेळ – अंश
१२ वाजेला – ४१ अंश
१२ वाजेला – ४२ अंश
१ वाजेला- ४३ अंशापुढे
२ वाजेला – ४३ अंश
३ वाजेला – ४३ अंशापुढे
४ वाजेला – ४२ अंश
५ वाजेला – ४२ अंश
६ वाजेला – ४० अंश
७ वाजेला – ३८ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३७ अंशावर स्थिरावणार.